मुंबईच्या पायधुनी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या गूढ पद्धतीने मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. सध्या मुंबई पोलीस टॉक्सिकोलॉजी रिपोर्टची वाट बघत असून त्यातूनच मृत्यूचं खरं कारण उघड होणार आहे. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या प्राथमिक तपासात खाद्यपदार्थांमध्ये कोणतेही विषारी किंवा हानिकारक पदार्थ आढळले नाहीत.
अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून बिर्याणी, कलिंगड, फ्रिजमधील पाणी, कच्चा आणि शिजवलेला भात, चिकन, खजूर आणि मसाले यासह एकूण ११ नमुने गोळा केले. चाचणीत भेसळीचा कोणताही पुरावा न आढळल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय.
पोस्टमार्टम रिपोर्ट काहीतरी वेगळंच सूचित करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात मॉर्फिन हे एक प्रकारचं वेदनाशामक असल्याचं आढळून आलं. इतकंच नाही तर शरीराच्या काही टिश्यूंमध्ये एक असामान्य हिरवा रंगबदल दिसून आला. असा रंगबदल सामान्यतः विषारी पदार्थामुळे होतो. तथापि, ते विष नेमकं कोणतं होतं आणि ते शरीरात कसं शिरलं याची माहिती अजून मिळालेली नाही.
२६ एप्रिल रोजी ही घटना घडली. ४० वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंहोतं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की, कलिंगज खाल्ल्यानंतर ते, त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि त्यांच्या दोन मुली, आयेशा (१६) आणि झैनब (१३), अचानक आजारी पडले. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि अखेरीस त्या चौघांचाही मृत्यू झाला.
तपास अधिकारी या प्रकरणाची सर्व बाजूंनी तपासणी करत असल्याचं सांगितलंय. परंतु पोलीस अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. कलिना फॉरेन्सिक लॅब, एफडीए आणि जेजे हॉस्पिटल यांच्या सविस्तर रिपोर्ट्सची प्रतीक्षा केली जातेय. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे विष सेवन केलं गेलं होतं का आणि तसे असल्यास ते कोणत्या वेळी केलं गेलं, हे टॉक्सिकोलॉजी रिपोर्टमधून स्पष्ट होणार आहे.