मुंबईवर पाणी संकट
धरणांमध्ये फक्त १०.३५% पाणीसाठा शिल्लक
मुंबई महानगर पालिकेने १०% पाणीकपात लागू केली
पाण्याचा अपव्यय केल्यास कारवाई होणार
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईवर पाणी संकट असून मुंबई महानगर पालिकेने पाण्याच्या वापराबाबत नियमावली जारी केली आहे. मुंबईतील नवीन बांधकामे, जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात करण्यात आली. पिण्याच्या पाण्याच्या संरक्षणासाठी महापालिकेकडून अतिरिक्त उपाययोजना लागू करण्यात आली आहे. जर मुंबईकरांनी पाण्याचा गैरवापर केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.
'अल निनो'मुळे पावसाने ओढ दिल्याने आणि मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने होत आहे. पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरात १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत सुनिश्चित करण्यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरावरही १७ जून २०२६ पासून आवश्यक मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
मुंबई शहर व उपनगरांसाठी सध्या प्रतिदिन सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लीटर (MLD) इतकी पाण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध पर्यायामधून मुंबई महानगराला प्रतिदिन सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लीटर इतके पाणी पुरविले जाते. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली असून आज १६ जून २०२६ रोजी उपलब्ध पाणी साठा हा १०.३५ टक्के इतकाच शिल्लक आहे. पावसाळा लांबल्याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे. पिण्याच्या पाण्याची बचत करण्याकामी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
- सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येत आहेत.
- नवीन बांधकाम जल जोडणी पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत मंजूर करण्यात येणार नाहीत.
- सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येत आहेत.
- जलजोडणीधारकांकडून वाढीव जलजोडणी / अतिरिक्त जलजोडणी करीता अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठी तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवण्यात येणार आहे.
- औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे.
- एरीअेटेड वॉटर व पॅकेज वॉटर बॉटलिंग प्लॅंटला दिलेल्या जलजोडण्यातून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात येत आहे.
- सार्वजनिक स्वच्छतागृह व प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टँकर / बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा व पिण्याच्या पाण्याची बचत करावी.
- पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त, इतर वापरासाठी विहिरी, कुपनलिका, विधनविहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
- वाहन धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे, रस्ता / परिसर धुण्यासाठी बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा.
- मध्य रेल्वे / पश्चिम रेल्वे / RCF/ HPCL / BPCL / Navy / MIDC / BPT आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी व परिचालनासाठी कुलाबा तसेच इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील (STP) प्रक्रियायुक्त पाण्याचा फेरवापर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.