

मुंबईमध्ये पाणीसंकट
मुंबईत १० टक्के पाणी कपात
बीएमसीचा मोठा निर्णय
धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झाली
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने १५ मेपासून मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात मुंबईसोबतच ठाणे, भिवंडी आणि आसपासच्या भागांनाही लागू असणार आहे.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, धरणांमधील वापरण्यायोग्य पाणीसाठा घटत चालला असून, यंदाच्या मान्सूनबाबत भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल या हवामान घटकांमुळे यंदाच्या वर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये मिळून ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लिटर इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा वार्षिक गरजेच्या केवळ २३.५२ टक्के इतकाच असल्याचे बीएमसीने स्पष्ट केले आहे. मुंबईच्या वार्षिक पाणी गरजेचा आकडा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका आहे. उन्हाचा वाढता तीव्रपणा, पाण्याचे वाढते बाष्पीभवन आणि पुढील काही महिन्यांतील नियोजन लक्षात घेऊन ही कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बीएमसी प्रशासनाने सांगितले. पाणीसाठा समाधानकारक पातळीवर येईपर्यंत ही कपात कायम राहणार आहे.
दरम्यान, मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी भातसा धरणातील राखीव साठ्यातून १ लाख ४७ हजार ९२ दशलक्ष लिटर आणि अपर वैतरणा धरणातून ९० हजार दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहितीही बीएमसीने दिली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अशी विनंती करत बीएमसीने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाण्याची नासाडी टाळून दैनंदिन जीवनात पाणी बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.