पुण्यात विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात काही मंडळांनी असमाधान व्यक्त केलं.
सकाळी सातपासून मिरवणूक सुरु करण्याची मागणी समोर आली.
एकच ढोलताशा पथक वापरण्याचा प्रस्तावही चर्चेत.
प्रशासनासोबत अंतिम निर्णयासाठी लवकरच बैठक होणार.
अवघ्या जगाचे लक्ष यंदाच्या गणेशोत्सवावर लागले आहेत. काही दिवसांतच गणरायाचे धुमधडाक्यात आगमन होणार आहे. त्याचबरोबर गणरायाला निरोप देताना कोणती काळजी घ्यावी यासाठी अनेक मंडळ बऱ्याच दिवसांपासून पूर्वनियोजन करत आहेत. अशातच आता पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या आयोजनाबाबत वादग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे कलादालनात पार पडलेल्या एका बैठकीत पुण्यातील सत्तरहून अधिक गणेश मंडळांचे पदाधिकारी एकत्र आले आणि विसर्जन मिरवणुकीसंबंधी काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत यंदा विसर्जन मिरवणुकीच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार असून ढोल ताशा पथकावर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत.
या बैठकीत अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात नाराजी व्यक्त केली. लक्ष्मी रस्त्यावरील पारंपरिक मिरवणुकीत दरवर्षी सुमारे तीनशेहून अधिक गणेश मंडळे सहभागी होतात. मात्र, पाच मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीनंतरच उर्वरित मंडळांना विसर्जनासाठी संधी मिळते. यामुळे अनेक मंडळांना संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, तर काहींना रात्री उशिरापर्यंत रांगेत थांबावे लागते.
याच पार्श्वभूमीवर काही मंडळांनी पाच मानाच्या गणपतींपूर्वी म्हणजेच सकाळी सात वाजल्यापासून मिरवणुकीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. सकाळी दहा वाजता मिरवणूक सुरू होण्याआधीच काही मंडळांनी सुरुवात करण्याची मागणी केली असून, यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकीच्या वेळापत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय, मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या गोंगाटावर नियंत्रण ठेवण्यासाठीही एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रत्येक मंडळाने फक्त एकच ढोलताशा पथक वापरावे, असा मुद्दा चर्चेत आला आहे. ढोलताशा पथकांच्या संख्येमुळे मिरवणूक लांबते, तसेच आवाजाच्या प्रदूषणावरही नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शहरातील काही प्रतिष्ठित मंडळांनीही या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील काही दिवसांत यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने लवकरच प्रशासनासोबत बैठकीचे आयोजन करून या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संपूर्ण पुणेकरांसाठी अत्यंत भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही विसर्जन मिरवणूक अधिक सुयोजित, वेळेवर आणि सर्व मंडळांना न्याय देणारी होण्यासाठी आता मंडळे एकत्र येताना दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.