Maharashtra Live News Update : प्रमाणपत्र वाटपाची सरकारची जबाबदारी; मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा सरकारवर बरसले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यातील राजकीय घडामोडी, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्ध, उन्हाच्या झळा वाढल्या, तापमानात वाढ, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam
Published On

प्रमाणपत्र वाटपाची सरकारची जबाबदारी; मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा सरकारवर बरसले

राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात मराठवाड्यासाठी जीआर काढला... हा जीआर राज्य सरकारने काढल्यामुळे प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सरकार वरती गरजले.. कुणबी प्रमाणपत्र मिळत नसेल तर, मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांनी उद्यापासून आपापल्या भागातील आमदारांना प्रमाणपत्र का मिळत नाही याबाबत विचारणा करण्याचे आवाहन त्यांनी केले

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची भर बाजारपेठेतून काढली धिंड

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. भर चौकात पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींनाची शहरातील बाजारपेठेतून धिंडी काढण्यात आलीय.. वाहतून नियमन करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर तरुणांच्या टोळक्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती.. याप्रकरणातील तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.. ज्या परिसरात या आरोपींनी दहशत निर्माण केली होती, त्याच परिसरात पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

अंबरनाथमध्ये सव्वाचार कोटींचं चरस जप्त; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

अंबरनाथमध्ये तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचा चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही मोठी कामगिरी केली आहे.

उल्हासनगरात मनसे पदाधिकाऱ्याची गाडी जाळली, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर मध्ये मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांची चार चाकी गाडी अज्ञात इसमांनी रात्रीच्या सुमारास जाळली. गाडी जाळतांनाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे , मैनुद्दीन शेख यांनी आपली चार चाकी गाडी पक्ष कार्यालयासमोर उभी केली होती. रात्री साडेचार वाजताच्या सुमारास एक बुरखादारी इसम तिथे आला आणि त्याने गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या इसमाचा शोध घेत आहेत, गाडी पेटवण्यामागे काय उद्देश होता हे मात्र समजू शकले नाही.

पुण्याच्या भोपळे चौकात इमारतीला आग

पुण्यात कपड्याच्या दुकानाला आग, कपड्याचा माल जळून खाक

पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरातील भोपळे चौकात इमारतीला आग

आगीमुळे कपड्याच्या माल जळून खाक

उल्हासनगरात मनसे पदाधिकाऱ्याची गाडी जाळली

उल्हासनगर मध्ये मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांची चार चाकी गाडी अज्ञात इसमांनी रात्रीच्या सुमारास जाळली , गाडी जाळतांनाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे , मैनुद्दीन शेख यांनी आपली चार चाकी गाडी पक्ष कार्यालयासमोर उभी केली होती . रात्री साडेचार वाजताच्या सुमारास एक बुरखादारी इसम तिथे आला आणि त्याने गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या इसमाचा शोध घेत आहेत, गाडी पेटवण्यामागे काय उद्देश होता हे मात्र समजू शकले नाही ,

टाटा पॉवरने विणला सशक्तीकरणाचा 'अनोखा धागा'

international womens day
Tata power Saam tv

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टाटा पॉवरने नुकतेच ‘अनोखा धागा’ या आपल्या उपजीविका उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रवासाचा गौरव केला. वंचित समुदायांतील महिलांना करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम, महाराष्ट्रातील मावळ येथील एका छोट्या शिवणकाम केंद्रापासून सुरू झाला होता. आज या उपक्रमाने महिला गटांच्या एका अशा शक्तिशाली आणि चैतन्यमय नेटवर्कचे रूप घेतले आहे, जे केवळ आत्मनिर्भरता आणि शाश्वत उत्पन्नच सुनिश्चित करत नाही, तर समाजात एक मजबूत महिला नेतृत्व देखील घडवत आहे.

मुंबईत, 'अनोखा धागा' अशा महिलांना एका नेटवर्कमध्ये जोडतो ज्या घराची जबाबदारी सांभाळून आपल्या कष्टाने आणि कौशल्याने वस्तू बनवतात. या उपक्रमात त्यांना काम शिकवले जाते आणि वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही पुरवला जातो. यामुळे महिलांना आपल्या घरूनच सहजपणे काम करता येते आणि त्यांना शिकण्यासोबतच कमाईचे एक भक्कम साधनही मिळते, जे त्यांच्या आर्थिक विकासाचा आधार बनते.

Mumbai : पवईत डोंगराला आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक

पवई हिरानंदानी येथे डोंगराला आग लागल्याने शेकडो झाडे जळून खाक

रात्री लागलेली आग अजूनही आटोक्यात आलेली नाही

मुंबईच्या गोरेगावात १३ अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

गोरेगावात १३ अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्ग व 5D रस्त्यावर पालिकेची कारवाई

पी दक्षिण’ विभागाकडून १३ अनधिकृत दुकानांवर निष्कासन

स्वामी विवेकानंद मार्गावरील ३ दुकाने, तर 5D रस्त्यावरील १० दुकानांचे वाढीव बांधकाम हटवले

अनधिकृत बांधकामांमुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याने कारवाई

Maharashtra Live News Update : 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पन्नास लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका व्यापाराचे अपहरण करण्यात आलं होतं. मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपींचे 50 किलोमीटर पाठलाग करून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे. तसेच अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ठाणे पोलिसांना मोठे यश; 48 घरफोडी उघड, 9.03 किलो सोन्याचे दागिने जप्त

महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले असून त्यांनी 48 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 9.03 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून त्यांची अंदाजे किंमत 9 कोटी 39 लाख रुपये इतकी आहे.

उमरगा शहरात भीषण अपघात; भरधाव कार चहाच्या हॉटेलमध्ये घुसली, दोघांचा जागीच मृत्यू 

धाराशिवच्या उमरगा शहरातील बायपास रोड परिसरात दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय.तुळजापूर येथे देवीचे दर्शन करून हैदराबादकडे परत जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एस-क्रॉस (S-Cross) कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या चहाच्या हॉटेलमध्ये घुसली.

भांडुप पश्चिम येथे स्टेशन प्लाझा इमारतीचा भाग कोसळला 

भांडुप पश्चिम येथील स्टेशन जवळ असलेल्या स्टेशन प्लाझा या इमारतीचा एक मोठा भाग आज अचानक कोसळला. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या ठिकाणी गर्दी कमी होती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Maharashtra Live News Update : सांगली जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा, 10 पैकी सहा ठिकाणी महाविकास आघाडीचे सभापती 

सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.. दहा पैकी सहा ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सभापती,उपसभापती निवडून आले आहेत. भाजपाला केवळ जत पंचायत समितीवर सत्ता मिळवता आली आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाने तासगाव पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवला आणि शिवसेना शिंदे गटाने खानापूर,आटपाडी पंचायत समितीवर आपली सत्ता स्थापन केली आहे.

पुणे येथून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची संगमनेर टोलनाक्यावर सुटका

ण्यातून एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार झालेल्या टोळीला संगमनेर पोलिसांनी पकडले आहे.. संगमनेर तालुक्यातील नाशिक - पुणे महामार्गवरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे.

हाॅटेल मधील गॅसचा स्टाॅक संपला,लाकडाची भट्टी पेटवली

अमेरिका आणि इराण या दोन देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका संपूर्ण जगासह राज्याला बसलाय.यवतमाळ येथे हाॅटेल व्यावसायिकांना तीन दिवसांपासून व्यवसायिक गॅस पुरवठा बंद केल्याने हाॅटेल बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर आलीये

उष्णतेमुळे वकिलांना दिलासा; १ मार्च आलाय ३० जून काळा कोट बंधनकारक नाही

१ मार्च ते ३० जून या कालावधीत वकिलांना काळा कोट न घालता न्यायालयीन कामकाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

उष्णतेमुळे काळा कोट घालून काम करताना अडचणी येत असल्याने ही सवलत देण्यात आली आहे. याबाबत ज्येष्ठ वकील निलेश आंधळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

ओशिवरा एस व्ही रोड येथील ए वन दरबार हॉटेल मागील झोपडपट्टीत मोठी आग

तीन ते चार झोपड्या आगीत जळून खाक

आगीची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

आगीत अडकलेल्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढले

झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि बांबू असल्यामुळे आग वाढण्याची शक्यता

अमेरिका इराण युद्धाचा परिणाम धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद

जिल्हाभरात भारत व एचपी गॅस कंपनीच्या प्रमुख गॅस वितरण केंद्रावरून गॅस पुरवठा बंद

घरगुती वापराचा गॅस बाबत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कमर्शियल गॅस पुरवठा बंद केल्याची पुरवठा विभागाची माहिती

गॅस वितरक एजन्सींना कमर्शियल गॅस वाटपाबद्दल गाईडलाईन जारी

हॉस्पिटल,शैक्षणिक संकुल यांनाच गॅस पुरवठा करा पुरवठादारांना सूचना, गॅस साठा करणाऱ्यांवर कारवाई होणार

व्यवसायिकांना गॅस सिलेंडर बंद झाल्याने हॉटेल चालकाने चुलीवर स्वयंपाक करण्यास केली सुरुवात

अमेरिका,इराण,इराक या देशांमध्ये सुरू असलेल्या योद्धाचा फटका धुळ्याच्या शिरपूर येथील हॉटेल व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे, या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावरती मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून, हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा पुरवठा कालपासून बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेला गॅस सिलेंडर मिळत नसल्याने, आता हॉटेल व्यवसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे,

वर्धा बाजार समितीत शेतमाल ठेवण्यावरून निर्माण झाला वाद

गहू, चणा व तूर आवक वाढल्याने शेतमाल ठेवण्याची अडचण

शेडमध्ये आधीच व्यापाऱ्यांचा माल असल्याने निर्माण झाली गोंधळाची स्थिती

सभापती अमित गावंडे यांची ठाम भूमिका; शेतकऱ्यांसाठी जागा मोकळी करण्याचे निर्देश

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने शेतमाल ठेवण्यासाठी जागेची समस्या निर्माण झाली आहे. यावरून व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली असून सभापती अमित गावंडे यांनी व्यापाऱ्यांचा माल शेडमधून खाली करून शेतकऱ्यांच्या मालासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

Sangli: विविध मागण्यांसाठी कवठेमहांकाळमध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी काढला गाढव मोर्चा

सांगली -

विविध मागण्यांसाठी कवठेमहांकाळमध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी काढला गाढव मोर्चा...

बेरोजगारी,शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शैक्षणिक आरोग्य समस्यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवठेमंकाळमध्ये गाढव मोर्चा काढण्यात आला.

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर थेट गाढव घेऊन मोर्चा काढत प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध नाही, त्यामुळे एमआयडीसी निर्मिती करावी, बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या

Solapur: सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

सोलापूर -

सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

ऑनलाईन गॅस बुकिंग होतं नसल्याने ग्राहक सिलेंडर घेऊन थेट एजन्सीला येतायत

मात्र दिवसाचा कोटा सकाळीच संपल्याने गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून देखील ग्राहकांना गॅस मिळतं नाहीये

एकीकडे शासन गॅसचा मुबलक साठा असून घाबरण्याचे गरज नाही म्हणतंय मग आम्हाला गॅस मिळतं का नाही असा सवाल ग्राहक उपस्थित करतायत

तर दुसरीकडे ग्राहकांनी एजन्सीला येऊ नये, गॅस घरपोच दिले जाईल असे आश्वासन एजन्सीतर्फे दिलं जातंय

Kolhapur: राज्यात कमर्शियल गॅसचा तुटवडा अनेक उद्योगांवर आले संकट

कोल्हापूर -

राज्यात कमर्शियल गॅसचा तुटवडा अनेक उद्योगांवर आले संकट

केटरिंग हॉटेल व्यवसायिकांसह विद्यार्थ्यांना भोजन पुरवणाऱ्या संस्था ही अडचणीत

विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण करण्यासाठी गॅस उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांवर नवे संकट

केंद्र आणि राज्य सरकारने शाळांच्या किचनला गॅस पुरवठा त्वरित करावा अशी मागणी

केटरिंग व्यावसायिक सागर शुक्ल यांची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवण देणाऱ्या केटरिंग व्यवसायाची झाली अडचण

Parbhani: राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड

परभणी -

राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून पंचवीस वर्षीय मनोज मुंडे यांची बिनविरोध निवड

सरकार आणि आमदारांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्याचा केला निर्धार

मनोज मुंडे हे गंगाखेड तालुक्यातील आकोली पंचायत समिती गणमधून निवडून आले आहेत

तरुण चेहऱ्याला संधी देऊन भाजपाने राजकीय भवितव्य ठरवले आहे 25 या वर्षी सभापती झालेल्या मनोज मुंडे यांनी राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे

तसेच गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे असल्यामुळे गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास करणारा असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे

यासोबतच नागरिकांना कुठल्या समस्या असतील तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा त्या समस्या सोडवल्या जातील असे देखील जनतेला आव्हान केला आहे .

Solapur: सोलापूरमध्ये कोणत्याही प्रकारचा गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होणार नाही

सोलापूर-

जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांची माहिती

सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुतवाडा निर्माण होणार नाही यासाठी जिल्हा पुरवठा प्रशासन सज्ज

युद्धजन्य परिस्थितीत प्रशासनाकडून घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी 'फिरते पथक' करण्यात आले स्थापन

सोलापूर जिल्ह्यात एकूण 94 गॅस एजेंसी असून त्या सर्व एजन्सीला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत सूचना..

आपल्या जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवस्थित पुरवठा सुरू आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा पुरवठा प्रशासनाकडून करण्यात आले आहे आवाहन

लातूर,धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, जालना या जिल्ह्याना ही सोलापूर मधून केला जातोय इंधन पुरवठा

Amravati: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये कापसाच्या जिनिंगला भीषण आग

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी मध्ये कापसाच्या जिनिंगला भीषण आग....

शहरातील राठी यांच्या कापूस जिनिग ला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे..

कापूस जिनिंगला का आग लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट...

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल.

राहुरीत पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला

टोळक्याने विकास वैराळ या कर्मचाऱ्याचे कपडे फाटोस्तर मारहाण केली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात 4 जणांसह 11 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

हॉटेल व्यवसायिकांना पेटवाव्या लागल्या चुली

इराण आणि इजराइल युद्धाचा फटका लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळतोय, अनेक हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने आता चुलींचा आधार घ्यावा लागलाय, हॉटेल चालक चुलीवरती आता स्वयंपाक करताना पाहायला मिळत आहेत

Pandharpur: पंढरपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद

पंढरपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.‌त्यामळे छोटे मोठे हाॅटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर छोटे व्यावसायिक आहेत. इस्त्राईल इराण युध्दामुळे सध्या इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद केले आहे. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर मागणी नुसार पुरवठा होत असल्याचे येथील गॅस सिलेंडर पुरवठादार अभिजीत माळी यांनी सांगितले.

Kolhapur: कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

हॉटेल व्यवसायिकांकडे शिल्लक राहिला केवळ एक दिवसांचा गॅस

यास वेळेवर उपलब्ध न झाल्याने हॉटेल करावी लागणार बंद

सरकारकडून योग्य सूचना न आल्याने अडचणीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या हॉटेल पासून लहान हॉटेल पर्यंत होणार परिणाम

हॉटेल व्यवसायिक कमर्शियल गॅस व्यतिरिक्त इलेक्ट्रिक गॅस शेगडी आणि डिझेल गॅस शेगडीच्या पर्यायाकडे वळले

कोल्हापूर जिल्हा हॉटेल व्यवसायिक संघाची आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

Karad: कराडला उद्या दोन हजार पैलवान येणार

महाराष्ट्रात कुस्ती खेळात पूर्वी होणारी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आता वेगवेगळ्या संघटनांकडून चार-चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊ लागल्याने या स्पर्धेबाबत निर्णय भूमिका घेण्यासाठी राज्यातील 40 महाराष्ट्र केसरी पैलवान, 10 ते 12 हिंदकेसरी पैलवान यांच्यासह दोन हजार पैलवान उद्या कराडला ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली. याठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत पत्रकार परिषद होणार असून राज्यातील पैलवान काय भूमिका घेणार याकडे राज्यातील कुस्तीप्रेमींच असणार आहे.

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी,विशाल अग्रवालला जामीन

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी बातमी

सुप्रीम कोर्टाकडून विशाल अग्रवाल ला जामीन

गेल्या २२ महिन्यांपासून विशाल अग्रवाल जेलमध्ये

अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अग्रवालवर गुन्हा दाखल

१९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कार ने २ जणांचा जीव घेतला होता

संबंधित कार चालक हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आलं होतं

मद्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवालने रचले होते कारस्थान

२१ मे रोजी विशाल अगरवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून केली होती अटक

मुंबईसह विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता

आज आणि उद्या मुंबईसह विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता

राज्यातील अनेक भागात तापमानात वाढ

येणाऱ्या काही दिवसात तापमान वाढणार

तर १४ मार्च नंतर मराठवाडा, विदर्भातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता

राज्यात अकोला मध्ये काल ४० डिग्री च्यावर होते

हवेमध्ये प्रतिचक्रवर्ती परस्थिती झाली की तापमान वाढते,गेले काही दिवसांत जास्त तापमान वाढते

महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये तापमान जास्त आहे.अनेक ठिकाणी ४० डिग्रीवर..

त्यामुळे उन्हाचे चटके जाणवु लागले आहेत

आंबेगाव येथे चौथा बिबट्या जेरबंद

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव खडकी येथे अवघ्या चार दिवसांत चौथा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गावात तब्बल पाच बिबटे एकत्र फिरताना नागरिकांनी पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी केली होती.

जालन्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प, हॉटेल व्यावसायिक अडचणीत

जालन्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे त्यामुळं जालन्यातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. जालन्याच्या काही हॉटेलमध्ये दोन दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असून दोन दिवसानंतर हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल मालकांवर येऊ शकते. दरम्यान या पार्श्वभूमीवर जालन्यातील हॉटेल व्यवसायिकांची आज बैठक होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा टाळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना

- सोलापूर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा टाळण्यासाठी भरारी पथकाची स्थापना..

- अमेरिका इस्राईल इराण पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता..

- घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता..

- जिल्हा पातळीवर दक्षता किंवा फिरते पथक स्थापन करून गॅस वितरकांवर लक्ष ठेवण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश

- तालुक्यात घरगुती एलपीजी गॅस सुरळीत वितरण होणे, घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता आणि फिरते पथक ठेवणार लक्ष

पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा

पुण्यात हॉटेल व्यवसायिकांना गॅस तुटवडा होणार?

कमर्शियल सिलेंडर देणं मोठ्या प्रमाणात कमी केले आहे.

गेल्या चार दिवसापासून पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी केला आहे.

अत्यावश्यक ठिकाणी १० टक्के कमर्शियल सिलेंडर देण्यात येत आहे

हॉटेल व्यावसीयकावर मोठा परिणाम व्हायला सुरवात

Kolhapur: कोल्हापुरातील गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

इराण इसराइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस भडकण्याच्या भीतीने नागरिकांमध्ये भीती

कोल्हापुरातील गॅस एजन्सी च्या दारामध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

गॅस एजन्सीच्या दारात नागरिकांनी लावल्या मोठ्या रांगा

आपल्यालाच वेळेत गॅस मिळावा यासाठी नागरिकांचे प्रयत्न

गॅस एजन्सी डीलर्स कडून नागरिकांना शांततेचे आवाहन

Badlapur: बदलापूर नगरपालिकेचं 1 हजार 98 कोटीचं अंदाजपत्रक सादर

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 हजार 98 कोटींचं अंदाजपत्रक सादर झालंय. बदलापूरच्या नगराध्यक्षा रूचिता घोरपडे यांनी 11.76 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देण्यासोबत मालमत्ता करात 50 टक्के सवलत आणि नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेसारख्या महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आलीय.

Ratnagiri: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हॉटेल व्यवसायावर

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हॉटेल व्यवसायावर

गॅस एजन्सी ना मिळणारा पुरवठा व्यवसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर

कालच्या दिवसांपर्यंत हॉटेल व्यवसायिकांना मिळणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होता सुरळीत

आता मात्र व्यावसायिक सिलेंडरची कमतरता, त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांच्या गॅस सिलेंडर पुरवठा निम्म्यावर

रत्नागिरी शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यवसायिक सिलेंडरचा दिला जातोय कोटा

रत्नागिरी शहरातल्या हॉटेल व्यवसायिकांना दिवसाला 600 ते 700 व्यवसायिक गॅस सिलेंडर आवश्यक

अशीच परिस्थिती राहिली तर व्यवसायाला मोठा फटका बसण्याची हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केली भीती

Petrol: देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

देशभरातील ग्राहकांना HPCL कंपनीकडून मेसेज

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून सर्व ग्राहकांना मेसेज

देशात इंधनाचा तुटवडा नाही

HPCL कंपनीकडून स्पष्टीकरण

देशभरात गॅस आणि इतर इंधनाचा भरपूर साठा उपलब्ध असल्याची कंपनीची माहिती

नागरिकांनी चिंता करू नये कंपनीकडून नागरिकांना करण्यात आले अश्वस्त

Pune Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर पुणे येथे पुणे नगर रोड वर झालेल्या भीषण अपघातात महेश धोंडीराम भगत याचा मृत्यू झाला. रात्री २ वाजेच्या सुमारास नगर पुणे रस्त्यावरून एका समोरील दुभाजकावर वळण घेत असताना दुचाकीला मागून आलेल्या १७ सीटर वाहनाची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकी चालक अक्षरशः काही अंतरावर रस्त्याने घासत समोर गेला.

Kudal: कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परप्रांतीय विक्रेत्यांकडून बनावट भांडी विक्री व्यवसाय होत असल्याचे आढळून आले आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी बाजारपेठमध्ये याचा पर्दाफाश करण्यात आला. या विक्रेत्यांकडून विक्री केली जाणारी भांडी बनावट असल्याचे निदर्शनास आले. ही भांडी १०० रूपये एक नग अशी विक्री होत असून सामान्य नागरिक ही कमी किमतीत असल्याने खरेदी करीत आहे. ही भांडी पत्र्याची असून त्याला लोहचुंबक चिकटत असल्याचे दिसून येते. हा पत्रा निकृष्ट दर्जाचा असून काही नागरिकांनी भांडी विकत नेऊन त्यांचा वापर केला तर ती काळी पडली. हे विक्रते दिल्ली येथील असून या विक्रेत्यांकडे कोणताही व्यवसाय परवाना नाही. तसेच यांच्याकडील चारचाकी वाहनाचा परवाना नाही. या प्रकरणी कुडाळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्हा परिषद सत्ता समीकरणात पुन्हा राजकीय हालचाली

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध असणारा आमदार तानाजी सावंत गट पुन्हा सक्रिय झाला आहे.आमदार सावंत गटातील 8 सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत तुळजापूर तालुक्यातील एक अपक्ष सदस्यही उपस्थित असल्याची माहिती आहे.त्यामुळे एकूण 9 सदस्यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.दरम्यान, शिवसेनेचे निवडून आलेल्या 15 सदस्यांपैकी 7 सदस्य पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत असल्याची माहिती आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा आधी ठरलेला फॉर्म्युला सावंत गटाला मान्य नसल्याची चर्चा रंगली आहे.यामुळे धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया 13 मार्च रोजी पार पडणार असून,त्याआधीच सुरू झालेल्या हालचालींमुळे सत्ता स्थापनेच्या समीकरणात काय बदल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhandara: वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

भंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असताना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता. हीच बाब लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागानं जिल्ह्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळा सकाळी भरतील. दुपारच्या कडक उन्हापूर्वीचं शाळा सुटणार असल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आणि प्रथमोपचार किट ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पालकांनी समाधान व्यक्त केलं असून, वाढत्या उष्म्यापासून मुलांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.

नाशिक महापालिकेत भाजप, शिंदे सेना करणार १ वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक

नाशिक महापालिकेत भाजप, शिंदे सेना करणार १ वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक

भाजप आणि शिंदे सेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा काळ, सूत्रांची माहिती

१० जागांसाठी मोठ्या प्रमाणात इच्छूक असल्याने एक वर्षाचा काळ देण्याचा भाजप आणि शिवसेना नेते विचार करत असल्याची माहिती

नाशिक महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष, भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवक पदासाठी ६ जागा

६ जागांसाठी भाजपकडे तब्बल ५०० जणांनी केले अर्ज

जास्तीत जास्त इच्छुकांना संधी देण्यासाठी एक वर्षाचा काळ देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

तर शिंदेंच्या शिवसेनेकडे देखील स्वीकृत नगरसेवक पदासाठी २ जागा

यासोबतच ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे स्वीकृत नगरसेवक पदाच्या प्रत्येकी १ जागा

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी हालचालींना वेग

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी हालचालींना वेग

जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष 18 मार्च तर पंचायत समिती सभापती साठी 12 मार्च रोजी होणार निवडणूक

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मिळाली आहे एक हाती सत्ता, आज गट नेत्याची निवड होणार

जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीसाठी भाजपकडून गटनेत्यांची निवड

सोलापूर झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मुंबई वारी..

सोलापूर झेडपीच्या सत्तेच्या चाव्या मुंबईतूनच फिरणार..

Yavatmal: यवतमाळमध्ये शक्तिपीठसाठी शेतकरी जिल्हा कचेरीवर

यवतमाळ जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गासाठी शेत जमिनीचे शासनाकडून मूल्यांकन करताना शेतकऱ्यांना योग्य बाजार बाजार भाव द्यावा या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून शक्तीपीठ महामार्गासाठी शेतजमिनी भूसंपादन करण्यात येत असताना शक्तिपीठ महामार्गाला विलंब का होताहेत असा प्रश्न शक्तीपीठ महामार्ग कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून विचारला आहे.

Pune: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यानेच मागितली लाच

पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मधील प्रकार

२ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाची कारवाई

तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत एका उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

आरटीई प्रवेशासाठी तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज

आरटीईतून होणाऱ्या 25% जागांकरिता आत्तापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार 240 अर्ज दाखल झाले आहेत.अर्ज दाखल करण्याकरिता मंगळवार हा शेवटचा दिवस असून यामुळे अर्जांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियमानुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुला मुलींसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामधून 25% राखीव जागा राहतात यवतमाळ जिल्ह्यातील इंग्रजी मराठी माध्यमांच्या 201 शाळांनी आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती या शाळांमध्ये 25% प्रमाणे दोन हजार 222 जागा आहेत.

Pune: अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला 'पीएमआरडीए'च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार

पुण्यात अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला 'पीएमआरडीए'च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला

मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडून चौधरी यांनी स्वीकारला पदभार

पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार,डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास

मिरज पंचायत समिती सभापती निवडीवरून अपहरण नाट्य ! शिवसेना शिंदे गटाच्या सदस्याच अपहरण केल्याचा आरोप..

सांगलीच्या मिरज पंचायत समिती सभापती निवडणुकीतून अपहरण नाट्याचा प्रकार घडला आहे..शिवसेना शिंदे गटाच्या पंचायत समिती सदस्याचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडत आहे. निवडीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिवसेना शिंदे गटाचे बुधगाव गणातून निवडून आलेले पांडुरंग इंगळेंचे त्यांच्या शेतातून अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी करत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.मिरज पंचायती समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले असून सभापती निवडीत महायुती सोबत जाण्याची भूमिका घेतली आहे,मात्र विरोधकांकडून प्रभावाच्या भीतीने हे अपहरण करण्यात आल्याचा आरोप देखील,शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.या घटनेमुळे मिरज पंचायत समिती सभापती निवडणूक मध्ये महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

यवतमाळ जिल्ह्याचा पारा 39 अंशावर

उन्हाचा पारा 39 अंशांवर पोहोचले आहे सुरुवातच कडक ऊन्हाने झाल्यामुळे विविध आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. गत दहा वर्षाच्या उचांकी तापमानाचे रेकॉर्ड मोडीत काढणारे यंदाचे तापमान असून दरवर्षी मार्च अखेरीस यवतमाळच्या तापमानात वाढ होते. यावर्षीचे तापमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वाढले आहे राजस्थान आणि गुजरात मधील उष्ण वारे थेट जिल्ह्याच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाले आहे याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे.

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 1100 कोटी रूपयांची ऊस बिले थकली

सोलापूर जिल्ह्यातील 31 साखर कारखान्यांनी चालू हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 1100 कोटी रूपयांची ऊस बिले थकवली आहेत. ऊस बिले मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत‌.

सोलापूर जिल्ह्यातील 34 कारखान्यांपैकी फक्त तीन कारखान्यांनी शेतकर्यांना ऊसाचे पैसे दिले आहेत. उर्वरित 31 कारखान्यांनी 1100 कोटी रूपयांची बिले थकवली आहेत.

ऊसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांचे बॅंकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत.

मद्यधुंद तरुणाने स्वतःचेच घर पेटवले...आष्टी येथील खळबळजनक घटना

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही जवळील आष्टी येथे एका मद्यधुंद तरुणाने स्वतःच्या राहत्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी येथील रहिवासी घनश्याम बालकदास केवट (वय ३५) याने काल रात्री अतिप्रमाणात मद्यप्राशन केले होते. नशेच्या भरात त्याने रागाच्या भरात स्वतःच्याच घराला आग लावून दिली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.आग इतकी भीषण होती की ती विझवणे स्थानिक रहिवाशांच्या आवाक्याबाहेर होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी हानी टळली. मात्र, या आगीत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.घराला आग लावल्यानंतर आरोपी घनश्याम केवट घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.पोलीसानी आरोपीला उशिरा रात्री अटक केल्याची माहिती आहे.याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

यवतमाळ बस स्थानकात महिलांच्या रांगा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस प्रवासात महिलांना देण्यात आलेली 50% सवलत मिळविण्यासाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड किंवा स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले असून यवतमाळ बस स्थानकात महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्यासाठी मोठ्या रांगा लावण्याची वेळ आली आहे यामुळे भर उन्हात महिलांसह ज्येष्ठांना रांगेत उभे राहावे लागत आहे.

वाशिम जिल्ह्यात अजूनही ७ हजार १५३ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक करण्यात आले आहे. मात्र वाशिम जिल्ह्यात अजूनही ७ हजार १५३ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २लाख ३०हजार ९५८ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार १५३ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही. यामध्ये आधार सादर न केलेल्या २ हजार ९४७ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. वेळेत प्रमाणीकरण न झाल्यास हे विद्यार्थी नोंदणीत अवैध ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com