संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली शहरातील परिवहन व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, एका प्रवाशाला आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन तब्बल दीड तास रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दर्शन परब नावाचे प्रवासी आपल्या लहान मुलासह घरी जाण्यासाठी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांनी १०० हून अधिक रिक्षांना हात दाखवला, मात्र एकाही रिक्षाचालकाने गाडी थांबवली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या परब यांनी व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडली. या व्हिडिओची दखल घेत मनसे नेते राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक आणि परिवहन व्यवस्थेवर कठोर शब्दांत टीका केली.
राजू पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, आपण पूर्वाश्रमीचे डोंबिवलीकर आहात. आज ठाण्यात राहत असलात तरी डोंबिवलीबद्दलचे आपले प्रेम कायम आहे, याची खात्री आहे. कधी काळी रिक्षा चालवून हालअपेष्टा सहन करून आपण आज परिवहन मंत्रीपदापर्यंत पोहोचलात, याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच त्यांनी पुढे म्हटले की, डोंबिवली आणि कल्याणमधील परिवहन व्यवस्थापन अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
स्थानिक रिक्षा युनियनवर काही ‘भाई-दादा’ प्रवृत्तीच्या लोकांचा प्रभाव असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः कल्याण-डोंबिवलीत येऊन वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.