when monsoon will arrive in Maharashtra 2026 : भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमध्ये यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, मान्सूनच्या प्रवासाबाबत समोर आलेल्या ताज्या अपडेटमुळे चिंता वाढली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने, या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. अंदमानमध्ये १८ मे पर्यंत मान्सून येईल, असा अंदाज होता; पण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याला उशीर झाला. आता मान्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा समोर आल्या असून, त्यानुसार महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होऊ शकतो.
विदर्भात उष्णतेची लाट, तर इतरत्र पावसाची शक्यता
मे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत राज्यातील अनेक भागांत अधूनमधून झालेल्या पावसामुळे विदर्भ वगळता इतर शहरांचा पारा फारसा वाढला नाही. आता १५ मे पासून वायव्य दिशेकडून येणाऱ्या जोरदार पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा (Hit Wave) इशारा देण्यात आला आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटे तसेच बंगालच्या उपसागराचा काही भाग ओलांडला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, यावेळी मान्सून लवकर दाखल होणार असला, तरी त्याची सुरुवात फारशी जोरदार नसेल.
केरळमध्ये यंदा कमकुवत मान्सूनचे संकेत
केरळमध्ये यंदा सुरुवातीला कमकुवत मान्सूनचा सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सून हंगामात सरासरीच्या (LPA) ९२% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, जे मान्सूनच्या कमकुवत सुरुवातीचे संकेत आहेत. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा दोन्ही परिस्थितींसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे.
केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार?
साधारणपणे १ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा तो थोडा लवकर म्हणजेच २६ मे २०२६ पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी (२०२५ मध्ये) केरळमध्ये मान्सून २४ मे रोजीच दाखल झाला होता. यंदा २६ मे रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याचा देशभरातील प्रवास सुरू होईल.
महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?
केरळमध्ये २६ मेच्या सुमारास मान्सून दाखल झाल्यानंतर, पुढील २ ते ४ दिवसांत तो तळकोकणात प्रवेश करेल. त्यानंतरच्या २ दिवसांत मान्सून मुंबईत धडकेल आणि १० जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज आहे. दरवर्षीपेक्षा मान्सून यंदा लवकर येत असला, तरी त्याच्या मार्गात वारंवार अडथळे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा मान्सून केरळमध्ये लवकर पोहोचणार असला, तरी संपूर्ण देश व्यापायला त्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. साधारणपणे मान्सूनला संपूर्ण भारत व्यापण्यासाठी ३५ ते ३८ दिवस लागतात, पण या वेळी हा प्रवास रेंगाळण्याची शक्यता आहे. 'स्कायमेट'चे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, या वर्षीच्या मान्सूनला २००२ च्या मान्सूनसारखाच धोका आहे. २००२ मध्ये मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता, तरीही संपूर्ण देश व्यापायला त्याला तब्बल ७९ दिवस लागले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.