Maharashtra government on pending e-KYC, Ladki Bahin Yojana installment news : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तर्गत ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुदत संपल्यामुळे ई-केवायसी अपूर्ण राहिलेल्या महिलांना जिल्हा महिला विकास विभागात सध्या कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही, कारण याबाबत सरकारने अद्याप कोणतेही नवीन निर्देश दिलेले नाहीत.
३० एप्रिलनंतर महिला विकास विभागात कागदपत्रे जमा करता येतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सरकारकडून यावर स्पष्टीकरण देत अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हिंगोली, सोलापूर, नंदुरबारसह अनेक जिल्ह्यात ईकेवायसीसाठी महिलांनी गर्दी केली होती. पण आता सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देत नव्याने ईकेवायसी होणार नसल्याचे सांगितसलेय.
राज्यात किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ ?
राज्यात आतापर्यंत तब्बल १ कोटी ७७ लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. योजनेसाठी ई-केवायसी करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाली होती आणि त्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ३० एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींना ईकेवायसीमध्ये दुरूस्ती करण्याची मुदत देण्यात आली होती. पण आता ती मुदत संपुष्टात आली असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही.
अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली ? किती महिला ठरल्या अपात्र?
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सुमारे १२ ते साडेबारा हजार पुरुष लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेली रक्कम शासनाच्या तिजोरीमध्ये पुन्हा वसूल करण्याचा निर्णय शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळताच ही वसुली प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे. अपात्र महिलांकडूनही सरकार पैसे वसूल करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यात जलपस ७० लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे. यापुढे त्यांच्या खात्यावर प्रति महिला १५०० रूपयांचा लाभ मिळणार नाही.
ई-केवायसीसाठी नवीन मुदत नाही, सरकारने नेमकं काय सांगितले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी संदर्भात सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये पसरत असलेल्या अफवा चुकीच्या असल्याचे नंदुरबार जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ईकेवायसाठी कोणतीही नवीन मुदत किंवा जिल्हा कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याबाबत सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचे त्यांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई केवायसी न केलेल्या महिलांसाठी सध्या कोणतीही नवीन संधी उपलब्ध नाही. तसेच पात्र महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जात असून महिलांनी थेट बँक खात्यात रक्कम तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चुकीच्या बातम्यांमुळे जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मार्च एप्रिलचा हप्ता खात्यात जमा, मे महिन्याचे १५०० कधी मिळणार?
राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर २ महिन्यांचे ३००० हजार रूपये एकत्र जमा झाले. ईकेवायसी आणि विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर एकही हप्ता देण्यात आला नव्हता. पण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले. पण मे महिना संपत आला आहे, त्यामुळे या महिन्यांचा लाभ खात्यात कधी जमा होणार? याकडे महिलांच्या नजरा खिळल्या आहेत.