मनोज जयस्वाल
वाशिम : आई- वडील असे पर्यंत लेकींना माहेर असते, असे म्हटले जाते. लग्नानंतर माहेर हरवलेल्या, म्हणजेच गावात आई- वडील, भाऊ कोणीच राहिले नाही; अशा लेकींना पुन्हा एकदा माहेरच्या आठवणींचा गोडवा देण्याचा अनोखा उपक्रम ग्रामपंचायतीने राबविला आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला असून माहेर हरवलेल्या लेकींचा सन्मान या नावाने हा हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
लग्न झाल्यानंतर मुलीला माहेर सुटते. दिवाळी, आखाजीच्या सणाला थोडे दिवस यायचे. यानंतर पुन्हा आपल्या घरी परतायचे. हे सर्व आई- वडील आणि भाऊ असेपर्यंत सुरु राहते. मात्र आई- वडील गेल्यानंतर माहेरचे गाव परके होऊन जाते. काही कार्यक्रमानिमित्ताने यायचे आणि परतायचे असते. परंतु लहानपणाच्या माहेरातील त्या आठवणी मनाच्या एका कोपर्यातच राहून जातात. या आठवणींना उजाळा देण्याचे काम ग्रामपंचायतीने दिला आहे.
५२ लेकींचा केला सन्मान
गावात खेळलेल्या, इथंच शिक्षण घेतलेल्या आणि नंतर सासरी स्थायिक झालेल्या ८८ महिलांचा शोध घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं. त्यातील ५२ लेकी या सोहळ्यास हजर होत्या. त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा साडी- चोळी देऊन आणि पाहुणचार करत सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे गावचे जावई असलेल्या या महिलांच्या पतींचा देखील शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं. गावातील नागरिक आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.
अनेकांचे डोळे पाणावले
गावकऱ्यांचा आणि ग्रामपंचायतीचा सहभाग असल्याने गावाची माया जिवंत करणारा हा सोहळा अनेकांसाठी भावनिक क्षण ठरला. आई-वडील नाहीत, माहेर नाही, पण गावाने पुन्हा एकदा आपलंस केलं; अशा भावना या लेकींनी व्यक्त केल्या. यावेळी अनेकांच्या डोळे अश्रूंनी पाणावले होते. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.