बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला पळून गेले होते. गुजरातमध्ये त्यांनी ३ जानेवारीपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला. पण पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यात आले.
एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई ४ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान ३ जानेवारी रोजी धारूर तालुक्यातील वायबसे दाम्पत्य चौकशीसाठी आणताच त्यांच्याकडून आरोपीपर्यंत जाण्याचा क्ल्यू मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे आरोपी घटना झाल्यापासून मोकाटच होते. या तिघांचा शोध सीआयडीचे १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी घेत होते. या व्यतिरिक्त बीड पोलिस दलातीलही ५ पथके या आरोपींचा शोध घेत होती. परंतू ते सापडत नव्हते. आरोपी मोकाट असल्याने सामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता. २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानंतर राजकीय नेतेही आक्रमक झाले होते.
सताधारी, विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात होते. असे असतानाच देशमुख कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी २ दिवसांपूर्वी जलसमाधी आंदोलन केले. यात पोलिस अधीक्षकांनी आरोपींच्या अटकेचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शोध मोहीम आणखी गतिमान केली होती. अखेर याला शनिवारी पहाटे यश आले. फरार ३ पैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर या आरोपींना सीआयडीच्या स्वाधीन केले आहे.
दरम्यान, सुदर्शन, सुधीर आणि नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलिस ठाण्यात आणले गेले. इथे एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नांची सरबत्ती केली. त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय.
सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे २ ते ३ दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता. परंतू त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले. पुण्यात ते एका व्यक्तीला भेटणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. कृष्णा अजूनही फरार असून पोलिस त्याचाही शोध घेत आहे.
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले. तेथील एका शिवमंदिरात थांबले. जवळपास १५ दिवस तिथेच राहिले. मंदिरातच जेवण करायचे आणि झोपायचे अशी त्यांची दिनचर्या आतापर्यंत होती.
सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. यावेळी बाजूलाच असलेल्या एका व्यक्तीचा मोबाइल घेतला. त्यात त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बातमी यूट्यूबवर पाहिली होती. तिथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत अन् राज्य सोडले. गुजरातला पळून गेले.
डॉ. संभाजी वायबसे आणि अॅड. सुरेखा वायबसे हे धारूर तालुक्यातील रहिवासी आहेत. घुले, आंधळे आणि सांगळे हे धारूर आणि केज तालुक्यातील रहिवासी असून, वायबसे यांच्या कासारी गावापासून जवळ आहेत. ते डॉक्टर जरी असले तरी ऊसतोड मुकादमही आहेत. त्यामुळं अनेकदा एखादा कामगार पैसे घेऊन पळून गेल्यास ते घुलेव्या मदतीने दबाव टाकून त्याला परत आणत होते. त्यामुळं घटनेनंतर घुलेने वायबसे याला संपर्क केला होता. तसेच इतरही तांत्रिक बाबी तपासून वायबसे आणि त्यांच्या पत्नीला ३ जानेवारी रोजी नांदेडमधून बीडला चौकशीसाठी आणले होते. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच घुले आणि सांगळे यांना बेड्या ठोकल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.