राज्यातील बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणासंदर्भात आज मुंबई सत्र न्यायालय 20 वर्षांनी निकाल देणार होते. मात्र न्यायालयाने हा निकाल राखून ठेवत 19 जूनला निकाल देणार आहेत. तब्बल 20 वर्षांनी हा निकाल लागणार होता, मात्र न्यायाधीशांनी आणखी वेळ लागणार असल्याचे सांगत आणि त्यादिवशी सर्व आरोपीना हजर केले जाणार असल्याची माहिती न्यायाधीशांनी दिली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे संपूर्ण कुटुंबासह सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांच्यासोबत समद काझी यांचे कुटुंब देखील हजर होते. पवनराजे निंबाळकर यांचे चालक समद काझी यांचाही गोळीबारात मृत्यू झाला होता. तब्बल 20 वर्षानंतर खून खटल्याचा आज निकाल लागणार असल्याने संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले होते.
पवनराजे निंबाळकर हे मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कलंबोलीत राजकीय वादातून त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासाहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे, सप्टेंबर 2009 पासून या प्रकरणी पद्मसिंह पाटील जामिनावर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तरप्रदेशमधील बसपा नेते कैलास यादव, तसेच शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैमनस्यातून 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दिन आरोपीला सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला अन् पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. आज न्यायालयाने निकाल राखून ठेवत 19 जूनला देणार आहे.
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क झालं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे.
यासोबतच सोशल मीडियावरील घडामोडींवरही पोलिसांची विशेष नजर असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे नाव आरोपी म्हणून समोर आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये वातावरण अधिक संवेदनशील बनलं आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं असून, कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.