बुलढाण्यातील चिखला गावातील घटनेवरून वातावरण तापले असून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पोलिसांनी तात्काळ कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, संबंधित प्रकरणात एका लहान मुलीचे दोन तास अपहरण करण्यात आले, तसेच महिलांशी गैरवर्तन करून त्यांचे कपडे फाडण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गंभीर कलमे लावून आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा २५ तारखेनंतर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले. जामीन, पीकविमा आणि इतर प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महादेव मुंडे आणि सहआरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय काही जण गुंडगिरी, बोगस लाभार्थी आणि राजकीय फायद्यासाठी काम करत असून त्यामुळे समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित टोळीमुळे जात बदनाम होत असल्याचे सांगत समाजाने अशा प्रवृत्तींपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेलाही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्या निधनाची सर्व कुटुंबाला शंका असल्यास सखोल तपास व्हायलाच हवा. मात्र, गमावलेला व्यक्ती परत येणार नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडने जामीन अर्ज दाखल केला आहे. यावर जरांगे म्हणाले, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी बाहेर राहू शकत नाहीत, तो कोर्टात गेला काय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जरी गेला तरी त्याला सुट्टी नाही. जामीन मंजूर झाल्यास सरकार टिकेल का, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या दिवशी वाल्मीक कराडचा जामीन होईल त्याच दिवशी सरकार पडेल, असा दावा त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.