नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचा बिनविरोध विजय.
रोहित पवारांनी भाजपच्या बिनविरोध पॅटर्नवर प्रश्न उपस्थित केलाय.
धुळे, सोलापूर, जळगाव, अमरावतीसह अनेक ठिकाणी भाजपचा दबदबा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी नगरपरिषदेच्या आणि नगरपंतायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी रंगतदार लढती होत असल्याचं पाहायला मिळतंय. तर काही ठिकाणच्या नगरपरिषदेत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केलीय. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? असा सवाल रोहित पवार यांनी केला. पण खरंच भाजप बिनविरोध निवडणुका कशा जिंकत आहे. त्यांचा बिनविरोध पॅटर्न काय हे जाणून घेऊ.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप यावेळी थेट बिनविरोध विजय पॅटर्न राबवत आहे. राज्यभरातील अनेक नगर पंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये कोणती लढत न होता भाजप उमेदवार विजयी होत आहेत. धुळ्यामधील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये सर्व २६ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊ.
राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. नगरपरिषदेमधील संपूर्ण जागा बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद ठरलीय.
जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
येथील अनगर नगरपंचायतीत माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांचाही बिनविरोध विजय झाला. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गटातील उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यानंतर प्राजक्ता पाटील यांचा विजय झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भावाने देखील बिनविरोध विजय मिळवलाय. आल्हाद कलोती हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेत बिनविरोध विजयी झाले. त्यांच्या विजयात आमदार रवी राणा यांचा मोठा हात आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे "बिनविरोध मॉडेल" धोरणात्मकदृष्ट्या यशस्वी होताना दिसत आहे. हे सोलापूर, धुळे, जळगाव आणि अमरावती जिल्ह्यांमधील विजयावरून दिसतंय.
दरम्यान धुळे आणि सोलापूर आणि जळगावमधील विजयांमध्ये एक साम्य आहे. या तिन्ही जागी महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत तर दोन महिला थेट राज्यमंत्र्यांच्या कुटुंबातील आहेत. यातील दुसरं एक कारण म्हणजे, निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक माजी आमदार आणि जिल्ह्यातील प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात खेचून आणलंय. त्याचाच परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत.
तर काही जाणकारांच्या मते, ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत, त्या त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झालेत तर काही ठिकाणी विरोधी उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतलाय. त्याचबरोबर स्थानिक नेतृत्वावर पक्षाची पकड मजबूत आहे. भाजपनं स्थानिक पातळीवर मोर्चबांधणी मजबूत केलीय. त्याबरोबर भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे, त्याच्याच फायदा भाजपला होताना दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.