सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास ७५ लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. पुरामुळे पिकं वाहून गेली, पशुधनाचे नुकसान झाले. अतिवष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने आज मदतीबाबत मोठी घोषणा केली. शेतीपासून ते घरापर्यंत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची मदत करणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले. खरीपाच्या मोसमामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे, पिकांचे, जनावरांचे, घराचे नुकसान झाले. दुर्दैवाने अनेक जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. आम्ही प्रत्यक्षात जाऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तातडीचे मदत म्हणून १० हजार रुपये देण्याचा विषय असेल, गहू- तांदूळ देण्याचा विषय असेल आम्ही शक्य होईल ती मदत देण्याचा प्रयत्न केला. आम्ही साततत्याने जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत आहोत.'
तसंच, 'शेतकऱ्याचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली.रब्बीची पेरणी करण्याची क्षमता उरली नाही. यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना होतो. आमचा शेतकरी पुन्हा पायावर उभा राहिला पाहिजे. भविष्यात शेती आणि शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. १ कोटी ४३ लाख २२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. ६८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले. जास्त नुकसान २९ जिल्ह्यात झालं. २५३ तालुक्यांना सरसकट मदत केली जाईल. जिथे नुकसान झाले आहे तिथे नव्याने घर बांधण्यास सरकार मदत करणार आहोत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधून देणार आहोत. गोठ्यांची मदत वेगळी करणार आहोत. दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत केली जाईल. जेवढ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार मदत दिली जाईल.', असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १७८ तालुक्यांमध्ये १२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ७५ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनींवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १ लाख ६१ हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. ९ हजार २६३ हेक्टर जमिनीवरील माती खरडून गेल्याने २६ हजार शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. त्यामुळे हे शेतकरी सरकार कधी आणि किती मदत करणार याची वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.