पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर : उद्धव ठाकरे यांची वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही ठाकरेंच्या भेटीचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात काढले जात आहे. दोघांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास येत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. ठाकरे बंधू भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरातून भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या भेटीवर भाष्य केलं. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'आनंदाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले ही आनंदाची बाब आहे. यात राजकीय का पाहता? आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही'.
'महाराष्ट्रातल्या मनातलं काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसेल आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. मात्र काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असे म्हणणे योग्य नाही. हे फार मोठे विधान होईल, असे ते पुढे म्हणाले.
संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्या वादावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. 'पत्र लिहून कोणीही वाद निर्माण करू नये.मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगावं. त्यातील अडचण दूर करता येईल. मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही शासनाचे भाग आहेत. सर्व अधिकार मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात, ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. यात कुठलाही संशय नाही. मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असे मानणे ही चुकीचे आहे.
'राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय होत असतील. तर ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेऊ नये किंवा घेतल्या नंतर मंत्र्यांची मान्यता घेतली पाहिजे. मंत्री आणि राज्यमंत्री यांनी सामांजस्य दाखवले पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोलले पाहिजे', असे ते म्हणाले.
पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी पण ही माहिती माध्यमातून घेतली आहे. कारण मी सकाळपासून विविध कार्यक्रमांमध्ये फिरतो आहे. त्यामुळे मला ब्रीफिंग घेता आलेलं नाही. मात्र, जे माध्यमात दिसलं त्याप्रमाणे पुणे पोलिसांनी एक रेव पार्टीवर छापा टाकला आहे. त्यामध्ये काही लोक सापडले आहेत. त्यामध्ये काही ड्रग्स वगैरे सापडले आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्ण ब्रीफिंग घेतल्यानंतर यावर बोलू शकेल. मात्र प्राथमिक दृष्ट्या असा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडल्याचा दिसून येत आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.