काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार
७,५०० नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार
२०२९ निवडणुकांसाठी काँग्रेसची तयारी सुरू
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीआधीच महाराष्ट्राचं राजकारण ढवळणार असल्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. ७००० नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. बारामती लोकसभा निवडणूक, निवडणूक आयोगाची भूमिका आणि काँग्रेस पक्षाचे आगामी 'संघटन सृजन' अभियान यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला.
काँग्रेस पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. काँग्रेसमध्ये 'संघटन सृजन' या प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्रात ७,५०० नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रमही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली. या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, 'काँग्रेसने तेथून यशस्वी माघार घेतली असली तरी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आणि तो पक्ष स्वतःला काँग्रेसशी जोडत असल्याचा दावा सपकाळ यांनी फेटाळून लावला. तसेच पुणे शहरासाठी दोन शहराध्यक्ष नेमणे ही एक संघटनात्मक प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामती लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, 'काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय नाही. सुनेत्रा पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन विनंती केली होती, त्यानंतर प्रदेश काँग्रेसने हा निर्णय घेतला. मात्र, २०२९ मध्ये आमचा उमेदवार नक्कीच मैदानात असेल.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मतचोरीचा आरोप केला. ते म्हणाले, 'निवडणूक आयोग हा एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वागत आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ज्या पद्धतीने आयोग काम करत आहे, ते पाहता 'मत चोरी'चा मुद्दा आम्ही पुन्हा एकदा एसआयआरच्या माध्यमातून लावून धरणार आहोत.'
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधत सपकाळ म्हणाले की, 'पुढील वर्षभर काँग्रेस पक्ष महात्मा फुले यांच्या विचारांना अभिवादन करत पुरोगामी चळवळीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, पहिला पोवाडा लिहिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी मानले. हा वारसा पुढे नेणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.