गिरीश निकम ,साम प्रतिनिधी
मुंबई: राज्यातलं लोकसभेचं मतदान संपलं. मात्र ज्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन्स ठेवलेले आहेत त्याबाबत संशयाचं मोठं वादळ निर्माण झालंय. बारामतीनंतर आता अहमदनगरमध्येही इव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमध्ये कुणीतरी अज्ञातानं रात्री घुसखोरी केल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी केलाय. त्यांनी तसा व्हिडिओच ट्विट केलाय. त्यामुळे मोठी खळबळ माजलीय. हा तर थेट लोकशाही चोरण्याचा प्रकार असल्याचा आरोप निलेश लंकेंनी केलाय.
EVM ठेवलेल्या सीसीटीव्हीत कोणतीही छेडछाड झाली नाही, असा दावा नगरच्या जिल्हाधिका-यांनी केलाय. रीतसर परवानगी घेऊन दुरूस्तीसाठी कर्मचारी गेल्याचं जिल्हाधिका-यांचं म्हणणंय. दरम्यान यापूर्वी इतर मतदारसंघातही असे प्रकार घडले आहेत. बारामतीत EVM ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही पाऊण तास बंद केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. शिरूरमध्येही EVM ठेवलेल्या रुममधील सीसीटीव्ही डिस्प्ले 24 तास बंद होते. साम टीव्हीनं याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर सीसीटीव्ही सुरु झाले. जिल्हाधिका-यांनीही स्ट्राँग रूमला भेट देत पाहणी केली होती.
दुसरीकडे राहुल गांधींनीही नुकताच उत्तरप्रदेशमधील एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात एक तरुण 8 वेळा मतदान करत असल्याचा दावा त्यांनी केलाय. सरकारी यंत्रणेवर दबाव आणून भाजपला लोकशाही लुटायची आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केलीय. ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये घडत असलेल्या अशा प्रकारांमुळे मतदार जिंकणार की EVM? असा सवाल उपस्थित होतोय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.