या वर्षी रक्षाबंधन ९ ऑगस्टला साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वेळी बहिणी आपल्या भावाच्या घरी जाऊन त्याच्या हातावर राखी बांधतील. पण बऱ्याचदा काही कारणांनी बहिणी स्वतः येऊ शकत नाहीत, तेव्हा भाऊ तिच्या घरी राखी बांधून घेण्यासाठी जातो. मात्र, धर्मशास्त्रांनुसार ही गोष्ट टाळावी असं मानलं जातं.
हिंदू धर्मात रक्षाबंधनाच्या दिवशी काही खास नियम आणि परंपरा पाळल्या जातात. योग्य वेळेची निवड, भद्राकाळ टाळणं, राखी बांधण्याची विधी आणि बहिणीने भावाच्या घरी जाणं हे सगळं महत्त्वाचं मानलं जातं.
मात्र अनेकदा भावंडांमध्ये अंतर, अडचणी किंवा इतर कारणांमुळे बहिणी माहेरी येऊ शकत नाहीत. अशावेळी भाऊ तिच्या घरी राखी बांधून घेण्यासाठी जातो. पण धार्मिकदृष्ट्या हे योग्य मानलं जात नाही. यामागे एक पौराणिक कथा आहे, जी रक्षाबंधनाच्या उगमाशी जोडलेली आहे.
पौराणिक कथेनुसार, एकदा राक्षसराज बलीने आपल्या कठोर तपश्चर्येमुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करून अमरत्वाचा वर मागितला होता. त्याच्या या इच्छेमुळे सर्व देव घाबरले की, हा राजा त्याचा गैरवापर करेल. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंना आपली चिंता सांगितली.
भगवान विष्णूंनी बलीचा अहंकार मोडण्यासाठी वामन अवतार घेतला. त्यांनी बलीकडून भिक्षेच्या स्वरूपात फक्त तीन पावलं जमीन मागितली आणि बलीने होकार दिला. त्याक्षणी भगवान वामनाने विशाल रूप धारण केलं. पहिल्या पावलात त्यांनी स्वर्गलोक व्यापला, दुसऱ्यात पृथ्वीलोक आणि तिसऱ्या पावलासाठी बलीने स्वतःचं डोकं पुढे केलं.
हे पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बलीला पाताळ लोकाचं राज्य दिलं. बलीने भगवान विष्णूंना विनंती केली की, त्यांनी पाताळ लोकातच त्याच्यासोबत राहावं. विष्णूंनीही त्याची ही मागणी मान्य केली.
भगवान विष्णूंनी पाताळ लोकात स्थायिक होताच लक्ष्मीदेवी चिंतेत पडल्या. त्यांनी आपल्या पतीला परत आणण्यासाठी एक युक्ती वापरली. त्यांनी ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलं आणि पाताळ लोकात जाऊन बलीला भाऊ मानायची इच्छा व्यक्त केली. यावेळी बलीने ती स्वीकारली. राखी बांधल्यानंतर लक्ष्मीदेवींनी बहीण म्हणून भेट मागतांना आपला पती भगवान विष्णूंना परत मागितलं. वचनबद्ध बलीने ते मान्य केलं आणि भगवान विष्णूंना परत जाण्याची परवानगी दिली.
या कथेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनेच भावाच्या घरी जाऊन राखी बांधावी. भावाने बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधून घेणं योग्य मानलं जात नाही. मात्र भाऊबीज या सणाच्या दिवशी भाऊने बहिणीच्या घरी जाऊन तिलक करून जेवण करावं, अशी परंपरा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.