कॅन्सर हा असा आजार आहे की, वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक ठरू शकतात. मात्र काही प्रकारच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अत्यंत सौम्य असतात आणि साध्या आरोग्य समस्यांप्रमाणे वाटतात. त्यामुळे हा आजार उशिरा लक्षात येतो. अशाच प्रकारात पित्ताशयाचा (Gallbladder) आणि पित्तनलिकेचा (Bile Duct) कॅन्सर मोडतो. हा कॅन्सर तुलनेने दुर्मिळ असला तरी अत्यंत वेगाने पसरतो आणि निदान उशिरा झाल्यास उपचार कठीण होतात.
पित्ताशयाचा कॅन्सर महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तीन ते पाच पट जास्त प्रमाणात आढळतो. विशेषतः उत्तर भारतात या कॅन्सरचं प्रमाण जास्त असून तरुणांमध्येही वाढलेली प्रकरणं दिसतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, “उत्तर भारतात पित्ताशयाचा कॅन्सर तुलनेने जास्त प्रमाणात आणि कमी वयात आढळतो. यामागे अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
पित्ताशयात खडे (Gallstones) असणं हा या कॅन्सरचा सर्वात मोठा धोका मानला जातो. अंदाजे 60 ते 80 टक्के रुग्णांना कॅन्सर होण्यापूर्वी पित्ताशयात खडे आढळतात. योग्य वेळी साध्या लेप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक शस्त्रक्रियेने हे खडे काढून टाकल्यास भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
दुसरीकडे, पित्तनलिकेचा कॅन्सर (Cholangiocarcinoma) हा प्रामुख्याने वयस्कर लोकांमध्ये आढळतो. धूम्रपान, दारूचं सेवन, लठ्ठपण, संसर्ग, इंफ्लेमेटरी बाउल डिसीज (IBD), तसंच हेपाटायटिस बी आणि सी या बॅक्टेरियामुळे धोका वाढतो.
पित्ताशय व पित्तनलिकेच्या कॅन्सरची लक्षणं लवकर ओळखली गेली तर उपचारांचं यश आणि रुग्णाचं आयुष्य दोन्ही वाढवता येऊ शकतं. या कॅन्सरची लक्षण काय आहेत ती जाणून घेऊया.
त्वचेचा आणि डोळ्यांचा पिवळसर रंग ही पित्तनलिकेच्या कॅन्सरची सर्वात महत्त्वाची सुरुवातीची खूण आहे. पित्तनलिकेत गाठ निर्माण होऊन मार्ग अडवल्यामुळे रक्तात बिलीरुबिन वाढतं आणि त्यामुळे त्वचा व डोळे पिवळे पडतात.
पित्ताशयातील खडे आणि कॅन्सर दोन्हीमध्ये वरच्या उजव्या पोटात वेदना जाणवतात. ही वेदना कधी बोचरी तर कधी तीव्र असू शकते आणि सतत किंवा अधूनमधून जाणवू शकते. अनेकदा लोक हे गॅस, अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतात.
आहार किंवा व्यायामात काहीही बदल न करता वजन कमी होणं, भूक मंदावणं ही लक्षणं गंभीरतेने घेतली पाहिजेत. कर्करोगी पेशी शरीराच्या मेटाबॉलिझममध्ये बदल करतात, ज्यामुळे हे बदल होतात.
पित्तनलिकेत गाठ झाल्याने पित्ताचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे लघवीचा रंग गडद आणि मल काहीसा पांढऱ्या रंगाचा दिसू शकतो. हे बदल दुर्लक्षित न करता पोटाचा अल्ट्रासाऊंड करणं आवश्यक आहे.
पित्ताचा प्रवाह अडल्यामुळे पित्तातील क्षार त्वचेत साचतात आणि त्यामुळे खाज येते. ही खाज साध्या मलम किंवा औषधांनी कमी होत नाही.
जेवणानंतर वारंवार मळमळ आणि उलट्या होणं ही पित्तनलिकेतील अडथळ्याची खूण असू शकते. गाठ वाढत गेल्याने पचन प्रक्रिया अधिक बिघडते.
पचनात अडथळा निर्माण झाल्याने आवश्यक पोषक घटक शरीरात शोषले जात नाहीत. त्यामुळे सतत थकवा जाणवणं ही सुरुवातीची महत्त्वाची खूण असू शकते.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.