लोक अनेकदा चाळीशीकडे केवळ एक आकडा समजून दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते, ही अशी वेळ आहे जेव्हा शरीरात हळूहळू बदल दिसू लागतात. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, अनियमित खाणं आणि तणाव यांचे परिणाम लगेच दिसून येत नसले तरी चाळीशीनंतर शरीर या सवयींबद्दल जबाबदारीची मागणी करू लागते. त्यामुळे अनेक गंभीर आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी हा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो.
40 हे वय अनेकजण केवळ एक आकडा म्हणून पाहतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, याच वयात शरीर हळूहळू बदलांचे संकेत देऊ लागतं. तरुणपणी उशिरापर्यंत जागरण, अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी, ताणतणाव किंवा व्यायामाचा अभाव यांचा फारसा परिणाम लगेच दिसून येत नाही. पण 40 नंतर शरीर या सवयींचा परिणाम दाखवू लागते. त्यामुळे या टप्प्यावर नियमित आरोग्य तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
एका वेबसाईटला माहिती देताना डॉ. शेली महाजन यांच्या मते, 40 वर्षांनंतर पुरुषांच्या शरीरात अनेक बायोलॉजीकल बदल सुरू होतात. शरीरातील चयापचय प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझमचा वेग कमी होऊ लागतो. हार्मोन्समध्ये बदल होतात आणि अनेक वर्षांपासूनच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. भारतीयांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे काही आजारांचा धोका आधीपासूनच अधिक असतो. त्यात शहरी जीवनशैली, ताणतणाव आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे आरोग्याच्या समस्या आणखी वाढू शकतात.
मधुमेह हा असा आजार आहे जो अनेकदा बराच काळ कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता तुमच्या शरीराचं आतील बाजूने नुकसान करत राहतो. वाढलेलं वजन, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण ही त्यामागील प्रमुख कारणं मानली जातात.
फक्त फास्टिंग ब्लड शुगर तपासणीवर अवलंबून राहणं योग्य नाही. HbA1c ही तपासणी मागील दोन ते तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेची पातळी दर्शवते. त्यामुळे प्रीडायबिटीज किंवा मधुमेहाचा धोका किती आहे, हे अधिक अचूकपणे समजू शकते. त्यामुळे 40 नंतर ही तपासणी नियमितपणे करण्याचा सल्ला दिला जातो.
हृदयाशी संबंधित अनेक समस्या सुरुवातीच्या काळात कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांना आजार वाढल्यानंतरच त्याची माहिती मिळते. संशोधनानुसार भारतात हृदयविकार हे प्रौढांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणांपैकी एक आहेत.
डॉ. शेली महाजन यांच्या म्हणण्यानुसार, भारतीयांमध्ये पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत कमी वयात हृदयविकाराचा धोका दिसून येतो. त्यामुळे लिपिड प्रोफाइल आणि रक्तदाबाची नियमित तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. या तपासण्यांमुळे भविष्यातील धोके वेळेवर ओळखता येतात आणि योग्य उपाययोजना करता येतात.
भारतीय पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी12 ची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. अनेकदा सतत थकवा येणे, स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे, कामात लक्ष न लागणं किंवा एकाग्रता कमी होणं यासारख्या समस्या वय वाढल्यामुळे किंवा ताणामुळे होत आहेत असं समजलं जातं.
मात्र यामागे शरीरातील पोषक घटकांची कमतरता हेही महत्त्वाचं कारण असू शकतं. विशेषतः व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास हाडं कमकुवत होऊ शकतात. तसंच शरीरातील कॅल्शियमचे योग्य शोषण होण्यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या व्हिटॅमिन्सची तपासणी वेळोवेळी करून घेणं फायदेशीर ठरतं.
40 वर्षांनंतर प्रोस्टेटशी संबंधित अनेक समस्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणं दाखवत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणीमुळे या समस्या लवकर ओळखता येतात. याशिवाय नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजसारखे लिव्हरचे आजार आणि किडनीशी संबंधित काही समस्याही होण्याचा धोका असतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.