

अनेकांना हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट या दोन्ही गोष्टी एकच वाटतात. पण प्रत्यक्षात या दोन्ही समस्या वेगळ्या आहेत. कार्डियक अरेस्ट ही हृदयाशी संबंधित गंभीर स्थिती आहे. यामध्ये हृदयाच्या विविध भागांमधील विद्युत प्रणालीत बिघाड होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके अचानकपणे अनियंत्रित वेगाने वाढू लागतात. सामान्यतः एका मिनिटात 60 ते 100 वेळा धडकणारं हृदय कार्डियक अरेस्टच्या वेळी 300 ते 400 ठोक्यांपर्यंत जाऊ शकतं.
हृदयाचे ठोके इतक्या वेगाने वाढल्यामुळे रक्तदाब अचानक कमी होतो. परिणामी हृदय शरीराच्या इतर भागांपर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचवू शकत नाही. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असते आणि वेळेत उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
चुकीची जीवनशैली, ताणतणाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे कोणालाही कार्डियक अरेस्टचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र काही लोकांमध्ये हा धोका तुलनेने अधिक असतो. ज्या व्यक्तींच्या कुटुंबात यापूर्वी कोणाचा कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाला असेल त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज असते. विशेषतः कुटुंबातील सदस्याला 50 ते 60 वयोगटात कार्डियक अरेस्ट आला असेल तर आनुवंशिक कारणांमुळे पुढील पिढीलाही त्याचा धोका वाढू शकतो.
याशिवाय हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असणं, उच्च रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, नियमित मद्यपान किंवा धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तींनाही कार्डियक अरेस्टचा धोका अधिक असतो.
अनेकांना कार्डियक अरेस्ट अचानक येतो असे वाटते. मात्र अनेक प्रकरणांमध्ये शरीर काही महत्त्वाचे संकेत आधीच देत असतं. हे संकेत वेळेवर ओळखले तर तातडीने वैद्यकीय मदत घेऊन परिस्थिती गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकते.
कार्डियक अरेस्ट येण्याच्या काही मिनिटांपूर्वी किंवा त्याआधी अनेकजण बेशुद्ध होऊ शकतात. काहींना प्रचंड घाम येतो, हृदयाचे ठोके वेगाने वाढल्याची जाणीव होते किंवा मळमळ सुरू होते.
यावेळी काहींना अस्वस्थता, घाबरल्यासारखं वाटणं, श्वास घेण्यास त्रास होणं, एकटेपणा किंवा बेचैनी जाणवणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं आणि छातीत दुखणं अशी लक्षणंही दिसू शकतात. ही लक्षणं दुर्लक्षित न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.
एखाद्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट आल्याचा संशय असल्यास सर्वप्रथम तातडीने डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे. रुग्णालयात पोहोचण्यास वेळ लागत असल्यास काही प्राथमिक उपाय केले जाऊ शकतात. अशा वेळी रुग्णाच्या हातांच्या तळव्यांना आणि पायांच्या तळव्यांना हलक्या हाताने चोळल्याने काही प्रमाणात मदत होऊ शकतं. तसंच कपाळावर ओलसर पट्टी ठेवणं आणि व्यक्ती शुद्धीत असल्यास पाणी देणं यामुळे थोडा आराम मिळू शकतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.