संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: बॉलिवूडमधील बहुचर्चित 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या कामगाराच्या मृत्यू प्रकरणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने राज्य सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष एर. सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, संबंधित निर्मिती संस्था आणि जबाबदार व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
AICWA च्या पत्रानुसार, 17 जून 2026 रोजी मुंबईतील फिल्मसिटीजवळील रॉयल पंप स्टुडिओमध्ये 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 42 वर्षीय सुतारकामगार चंद्रधारी सिंह यादव यांचा मृत्यू झाला. या घटनेत काही अन्य कामगार जखमी झाल्याचाही दावा करण्यात आला असून घटनेची संपूर्ण आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट मोठ्या बजेटचा असून त्यात रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांसारखे प्रमुख कलाकार काम करत आहेत. मात्र, सेटवर आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप AICWA ने केला आहे. योग्य सुरक्षा उपाययोजना राबविल्या असत्या तर हा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. मृत चंद्रधारी सिंह यादव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन अल्पवयीन मुली आहेत. कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य गमावल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे. त्यामुळे कुटुंबाला तातडीने 1 कोटी रुपयांची भरपाई, पत्नीला रोजगार किंवा आर्थिक सहाय्य तसेच मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी दीर्घकालीन आर्थिक संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
AICWA ने पत्रात संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांच्या सेटवर यापूर्वीही अपघात झाल्याचा उल्लेख केला आहे. 'देवदास' चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान काही कामगारांचा मृत्यू झाल्याचा तसेच 'पद्मावत' चित्रपटाच्या सेटवरही एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. चित्रपटसृष्टीत अनेकदा कामगारांकडून 16 ते 20 तास काम करून घेतले जाते. दीर्घ कामाचे तास, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षा नियमांची कमकुवत अंमलबजावणी यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात AICWA ने 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाच्या सेटसह संबंधित सर्व सेटचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच सुरक्षा नियमांचे संपूर्ण पालन झाल्याचे प्रमाणित होईपर्यंत शूटिंगला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील सर्व चित्रपटांच्या शूटिंग सेटवर नियमित सुरक्षा तपासणी आणि सुरक्षा ऑडिट अनिवार्य करण्याचे आवाहनही संघटनेने राज्य सरकारकडे केले आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती रोखावी, अशी मागणी AICWA ने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.