अदिती तरडे, साम टीव्ही प्रतिनिधी
मराठी रंगभूमीवर सध्या तुफान चाललेलं, ताजं टवटवीत असं नाटक म्हणजे 'वरवरचे वधू वर'. वरवरचं जरी नाव असलं तरी हे नाटक खोलात जातं, हसवता हसवता अनेक प्रश्न विचारतं आणि निखळ मनोरंजन करतं.
आतापर्यंत लग्न या विषयावर बरीच नाटकं आलेली आहेत मात्र, हे नाटक लग्न या संस्थेकडे आजच्या चष्म्यातून बघतं. लग्न म्हटल्यावर आताची पिढी ज्या ज्या गोष्टींचा विचार करते किंबहुना ज्या ज्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. लग्नाआधी ज्या विषयांवर बोललं गेलं पाहिजे आणि लग्नानंतर ज्या गोष्टी कृतीत उतरल्या पाहिजेत अशा विषयांवर नाटक भाष्य करतं.
जोडप्यांमध्ये नेमकं काय चुकतं, कशाकडे कधी कानाडोळा केला जातो तर, काय कधी कधी नकळत समजून घेतलं जात नाही, काय समजायला पाहिजे, आपल्यातलं काय सुधारलं पाहिजे याची सुटसुटीत मांडणी हे नाटक करतं.
या नाटकात तीन पात्र आहेत, मिस. विशाखा मोहित माने (सखी गोखले), मिस्टर मोहित माने (सुव्रत जोशी) आणि घरमालक पांडा (सुरज पारसनीस).
विशाखा आणि मोहितची कामानिमित्त भेट होते. दोघांच्याही कामाचं स्वरुप सारखंच. दोघेही कामात अतोनात व्यस्त त्यामुळे दोघांनाही लग्नासाठी जोडीदार शोधायलाही पुरेसा वेळ मिळत नाही, अशात दोघांची भेट होते. त्यातच नोकरीप्रमाणे दोघांच्या नावातही साम्य असल्याने घर मालकाकडून एक घोळ होतो. या घोळातूनचं नाटकांचं मुळ कथानक आकार घेतं.
सखी गोखलेनं आजच्या पिढीतली स्वतःच्या पायावर उभी असलेली, स्वतःची ठोस मतं असलेली अशी मिस. विशाखा मोहित माने ताकदीने साकारलीये. आत्ताच्या पिढीतल्याच मुलासोबत वावरताना, काम करताना एखाद्या स्वतंत्र, आत्मनिर्भर मुलीची होणारी तगमग, त्रागा सखी खूप ताकदीने सादर करते.
सुव्रत जोशीनं सोज्वळ, सालस, मुलींना ज्या मुलांसोबत असताना असुरक्षित वाटत नाही असा तरीही नकळतपणे काही रेड फ्लॅग्स असणारा मिस्टर मोहित माने निरागसतेने साकारलाय. पूर्वापार पुरुष म्हणुन घडवलेल्या आताच्या पिढीतल्या (काही) मुलाची एका स्वतंत्र, आत्मनिर्भर असणार्या मुलीसोबत राहताना, तिला मदत करायची असून सुद्धा फसताना होणारी तळमळ, हतबलता सुव्रत सहजतेने सादर करतो. या नाटकातलं तिसरं पात्र म्हणजे घरमालक 'पांडा'. रुढार्थाने चालत आलेल्या 'कुचका घरमालक' या चौकटीला हे पात्र तडा देतं. मनमोकळा, कामसू, प्रामाणिक, आपुलकीने सल्ला देणारा असा हा घरमालक 'पांडा' सुरज पारसनीसने उत्कटतेने साकारलाय.
नाटकात सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकही क्षण फिका वाटतं नाही. सुसाट कथानक, मस्त गाणी, नृत्य, प्रभावी सादरीकरण तसचं नाटकाच्या भावाला साजेशी वेषभूषा, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाशयोजना याची उत्तम मोट लेखक- दिग्दर्शक विराजस कुलकर्णीने बांधलीये.
सुमित राघवन यांची गायकी आणि निषाद गोलांबरे यांचं संगीत यामुळे नाटकातील गाण्यालाही विनोदी साज चढलाय. याच गाण्याच्या बोलांवर फुलवा खामकर यांनी सहज, सोपं, ताल धरायला लावणारं नृत्य बसवलंय. तसंचं, नाटकातील पात्रांची वेषभूषा, रंगभूषा तरुणाईला साजेशी आहे. नाटकाचं नेपथ्य आटोपशीर तरीही कथानकाला पुरेसं आहे.
तेजस देवधर याने केलेली प्रकाशयोजना नाटकाला तारुण्यसुलभ मुलामा चढवतं. तसचं, वेळोवेळी पात्रांची मनोवस्था, भावना समजून घेण्यास मदत करतं. पात्रांचे कपडे, नाटकातील प्रकाशयोजना, नेपथ्य यातून निळाई दिसत राहते. त्यामुळे ताजं, टवटवीत, तारुण्यसुलभ वातावरण बनलेलं राहतं.
थोडक्यात काय, नवं, ताजंतवानं काहीतरी पाहायचं असेल तर 'वरवरचे वधू वर' चांगला पर्याय आहे. सिंगल, नुकताच प्रेमात पडलेले, वर्षानुवर्ष प्रेमात असणारे, लव्ह किंवा अरेंज मॅरेज ठरलेले, लग्न झालेले, वर्षानुवर्ष संसार केलेले किंवा लग्न करून फसलेले अशा सर्वानीच पाहावं असं नाटक आहे.
कलाकार- सखी गोखले, सुव्रत जोशी, सूरज पारसनीस
दिग्दर्शक आणि गीतकार - विराजस कुलकर्णी
गायक - सुमित राघवन
संगीत- निषाद गोलांबरे
नृत्य - फुलवा खामकर
वेषभूषा - कल्याणी कुलकर्णी- कुबळे
रंगभूषा - सौरभ कपडे राजेश परब
प्रकाशयोजना - तेजस देवधर
नेपथ्य - प्रदीप पाटील
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.