जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अवकाळी पावसासोबत जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे. प्रामुख्याने चार तालुक्यांमध्ये गारपिटीचा अधिक तडाखा बसला असून यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट देखील झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस होऊन मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील रावेर तालुक्यात गारपीट झाली होती. यानंतर रविवारी यावल, चोपडा व जळगाव तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गाराही पडल्या आहेत.
गहू, केळी पिकांचे अधिक नुकसान
गारपिटीमुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात अधिक नुकसान झाले आहे. गहू, केळी, हरभरा, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला मका पाण्यात वाहून गेला आहे. तर अनेक ठिकाणी मका भिजल्याने देखील मोठे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात तब्बल ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर यावल, चोपडा आणि जळगाव तालुक्यात देखील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नुकसान भरपाईची मागणी
गारपिटीमुळे केळीची पाने फाटली, तर पावसामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले गहू, मका व हरभरा धान्य हे पाण्यात भिजले आहेत. या गारपिटीत गहू, केळी, हरभरा पिके पाण्यात भिजल्याने पाण्यामुळे धान्याला काळपटपणा येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी सरकारने तत्काळ पंचनामे करून लगेच मदत द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.