राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. तर सत्ताधाऱ्यांनी देखील यावर उघड नाराजी व्यक्त केली. माणिकराव कोकाटे आणि वाद आता हे समीकरण झाले असून दर महिन्याला याची एकेक मालिका प्रसिद्ध होत आहे. कोकाटे यांनी केलेला हा कारनामा पहिलाच नाहीये. मंत्रीपद मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी हे करू ते करू अशा एकशे एक घोषणांनाचा कोकाटेंनी पाऊस पाडला.
पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर तुम्ही सरकारने दिलेल्या पैशाने पोरांचे साखरपुडे, लग्न लावता असे वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. तर पंचनामे काय ढेकळांचे करायचे का? असे ही बरळले होते. त्यानंतर एका भाषणात कृषि खातं हे ओसाड गावची पाटीलकी म्हणत पुन्हा वाद ओढून घेतला होता. एकूणच माणिकरावांच्या विधानांची जंत्री वाढतच चालली आहे.
यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी देखील नाराजी व्यक्त करत मंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तीने संवेदनशील राहावे असा सल्ला दिला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यावर अंतिम निर्णय घेतील असे सुतोवाच करून राजीनाम्याचे स्पष्ट संकेत दिले. अशातच आज माणिकराव हे अजित पवारांना भेटायला आले. मात्र अजित पवारांनी मुंबई दौराच रद्द केला. आता हा दौरा रद्द झाला की मुद्दाम केला अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे येत्या काही दिवसात माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.