

भारताला आपल्या नेतृत्वाखाली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देणारा यश ढुल आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून आक्रमक फलंदाजी करणारा प्रियांश आर्या हे दोघंही दिल्ली क्रिकेटमधील चर्चेतील खेळाडू आहेत. मात्र आता या दोघांच्या टीममध्ये मैदानावर झालेल्या एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये मैदानावर मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
हा प्रकार दिल्ली प्रीमियर लीगच्या यंदाच्या सिझनमधील सामन्यानंतर घडल्याची माहिती आहे. यश ढुलकडे सेंट्रल दिल्ली किंग्सच्या टीमची धुरा सोपवण्यात आलीये. तर प्रियांश आर्य आउटर दिल्ली वॉरियर्सकडून खेळतोय. या दोन्ही टीम्समध्ये सामना झाला आणि सामना संपल्यानंतर काही वेळातच मैदानावर वातावरण तापल्याचे समोर आले.
या सामन्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही टीमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ काही खेळाडूंना बाजूला नेताना आणि समजावताना दिसतायत. सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या दाव्यांनुसार, यश ढुल आणि प्रियांश आर्या यांच्यात सामन्यानंतर जोरदार वाद झाला.
व्हिडीओमध्ये यशच्या टीममधील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एका खेळाडूला शांत करण्याचा प्रयत्न करतायत. हा खेळाडू यश असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे आउटर दिल्ली वॉरियर्सच्या खेळाडूंनीही गर्दीतून एका खेळाडूला बाजूला नेल्याचं दिसत असून तो खेळाडू प्रियांश आर्या असल्याचं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं जातंय.
दोन्ही खेळाडूंमध्ये नेमका वाद कशामुळे झाला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान झालेल्या एखाद्या प्रसंगावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला असावा आणि सामना संपल्यानंतर त्याचं रूपांतर मोठ्या वादात झालं.
या सामन्यात आउटर दिल्ली वॉरियर्सने प्रथम फलंदाजी केली. वॉरियर्सने ९ विकेट गमावत तब्बल २१६ रन्स केले. यजस शर्मा हा टीमचा सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरला. त्याने ४६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. २१७ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यश ढुलच्या नेतृत्वाखालील सेंट्रल दिल्ली किंग्सला साजेशी कामगिरी करता आली नाही. संपूर्ण टीम १७.२ ओव्हर्समध्ये १९१ रन्सवर ऑलआऊट झाली आणि त्यामुळे वॉरियर्सने सामना आपल्या नावावर केला.
सेंट्रल दिल्लीकडून कर्णधार यश ढुलने उत्तम फलंदाजी करत ४७ रन्स केले. त्याने अवघ्या २३ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ही खेळी केली.