
श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे-टी२० संघात उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे.
आयपीएल २०२५ आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये दमदार खेळ करुन त्याने स्वतःला पुन्हा सिद्ध केले.
आशिया कपमधून वगळल्यानंतर आता उपकर्णधारपदामुळे अय्यरला भविष्यातील कर्णधार मानले जात आहे.
Shreyas Iyer Vice Captain Of India : भारताचा संघ ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटसाठीचा संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढण्यात आले आहे. ती जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
आशिया कप २०२५ मधून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले होते. याआधी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्येही त्याला सामील करण्यात आले नव्हते. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये शुबमन गिलकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. तेव्हाही श्रेयस अय्यर संघात नव्हता. आंतरराष्ट्रीय पातळीवर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करुनही श्रेयस अय्यरवर अन्याय होत असल्याचे त्याचे चाहते म्हणत होते.
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली होती. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने ५३० धावा केल्या होत्या. उपात्य फेरीच्या सामन्यात त्याने अर्धशतकीय खेळी केली होती. २०२४-२५ च्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने खेळाडू आणि कर्णधार म्हणून उत्कृष्ट खेळ केला होता. या हंगामात अय्यरचा रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अशा अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगला फॉर्म होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही श्रेयस अय्यरचा फॉर्म टिकून होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकवून देण्यास मदत केली होती. स्पर्धेच्या शेवटच्या ३ सामन्यात अय्यरने ५७.३३ च्या सरासरीने १७२ धावा केल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २४३ धावा करत स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता.
आयपीएल २०२५ हा हंगाम श्रेयर अय्यरसाठी खास ठरला. त्याने १७ डावांमध्ये १७५.१ च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या. स्पर्धेत ३९ षटकार मारत हंगामात सर्वाधित षटकार मारणार भारतीय फलंदाज हा विक्रम त्याने जवळपास मोडला होता. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने अशा नाबाद ९७ धावा केल्या होत्या. फक्त खेळाडू म्हणून नाही, तर कर्णधार म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले होते. इतका चांगला फॉर्म असतानाही त्याला इंग्लंड दौऱ्यावर, आशिया कपमध्ये संघात सामील केले नव्हते.
आशिया कपमध्ये सामील न झाल्याने हताश न होता श्रेयस अय्यर इंडिया ए कडून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. या दौऱ्यामध्ये त्याच्याकडे भारताच्या ए संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती. पहिल्याच सामन्यात अय्यरने शतकीय खेळी केली. त्याने ८३ चेंडूत ११० धावा करत पुन्हा सामर्थ्य दाखवून दिले. आता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्याकडे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. एका प्रकारे, श्रेयस अय्यरने दमदार कमबॅक केले आहे. आताचा उपकर्णधार म्हणजेच भविष्यात भारताचा कर्णधार म्हणून चाहते अय्यरकडे पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.