

रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर
क्रिकेट फॅन्ससाठी धक्कादायक अपडेट
रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार का?
प्रत्येक चाहत्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल?
भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत मैदानावर खेळताना दिसले. अखेरच्या वनडे सामन्यात दोघांनी तुफानी बॅटिंग करून संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्मानं तर शतक ठोकलं. तर विराट कोहलीनंही नाबाद अर्धशतक तडकावलं. सूर हरवला आहे असं ओरडून सांगणाऱ्या आणि त्यांच्या रिटायरमेंटची वेळ जवळ आली आहे, असं म्हणणाऱ्यांना त्यांनी आपल्या बॅटनंच सणसणीत उत्तर दिलं आहे. आता टीम इंडियाचे हे चमकणारे तारे पुन्हा मैदानात कधी उतरणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण त्यांची वाट बघणाऱ्या चाहत्यांनी निराशा होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना मैदानात खेळताना बघण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ यांच्यात तीन सामन्यांची मालिका होणार आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिका अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत अ संघासोबत कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर वनडे मालिका होणार आहे. पहिला सामना १३ नोव्हेंबरला खेळवला जाईल. दुसरा सामना १६ तारखेला आणि तिसरा सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व सामने हे डे-नाइट खेळवले जातील. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट हे दोघेही खेळतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण क्रिकबझच्या रिपोर्टनुसार हे दोन्ही दिग्गज खेळाडू या मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.
या मालिकेतील पहिला सामना १३ नोव्हेंबरला होईल. त्यामुळं लवकरच बीसीसीआयकडून या मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, निवड समिती सध्या वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच रोहित आणि विराट कोहली या मालिकेत खेळू शकणार नाहीत. पण भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून, त्यात हे दोघेही खेळतील.
रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं. त्यामुळं ऑस्ट्रेलिया दौऱ्याची बरीच चर्चा झाली. खेळाडू म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच वनडे मालिका होती. या मालिकेत त्यानं जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळं तो मालिकावीरही ठरला. पहिल्या सामन्यात त्याला धावा करता आल्या नाहीत. पण दुसऱ्या मालिकेत त्यानं ७३ धावा कुटल्या. तर अखेरच्या सामन्यात त्यानं नाबाद १२१ धावा केल्या. विराट कोहलीला तर सुरुवातीच्या दोन सामन्यांत खातंही उघडता आलं नव्हतं. पण तिसऱ्या सामन्यात त्यानं सगळी कसर भरून काढली. अखेरच्या लढतीत त्यानं नाबाद ७४ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.