
लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकच चर्चा आहे ती म्हणजे आयपीएल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे या संघाचे आणि त्याचा कणा असलेल्या विराट कोहलीचे चाहते प्रचंड खूश आहेत. दुसरीकडे जबरदस्त फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्सचा एलिमिनेटरमध्ये फडशा पाडून मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफायर २ मध्ये पोहोचला आहे.
आता १ जूनला पंजाब किंग्जसोबत क्वालिफायर २ मध्ये सामना होणार आहे. यात कोण बाजी मारणार आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसोबत फायनलमध्ये कोण भिडणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधीच मुंबई इंडियन्ससाठी मॉन्सूनसारखीच आनंदवार्ता येऊन धडकली आहे. तर विराट कोहलीच्या बेंगळुरू संघाचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
प्लेऑफमधील हायव्होल्टेज सामन्यांनंतर सर्वात चर्चेत असलेली आयपीएल २०२५ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील अवघे दोन सामने शिल्लक आहेत. पण सर्वांच्या नजरा १ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या क्वालिफायर २ च्या सामन्यावर लागल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांत काट्याची टक्कर बघायला मिळणार आहे.
क्वालिफायर १ मध्ये बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात लढत झाली होती. यात बेंगळुरूनं अष्टपैलू कामगिरी करत पंजाबला नमवलं. मुंबई इंडियन्सनं एलिमिनेटर सामन्यात आतापर्यंत आकडेवारीत बलाढ्य दिसणाऱ्या गुजरात टायटन्सला धूळ चारली. मुंबई इंडियन्स आतापर्यंत चार क्वालिफायर २ सामने खेळली आहे. ही त्यांच्यासाठी पाचवी संधी आहे. क्वालिफायर २ मध्ये मुंबईनं आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, बेंगळुरूसाठी ही धोक्याची घंटा आहे, असंच दिसून येतंय.
आयपीएलमध्ये २०११ पासून प्लेऑफ फेरीला सुरुवात झाली होती. तेव्हापासून मुंबई इंडियन्स चार वेळा क्वालिफायर २ सामने खेळला आहे. दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये पराभूत झाले होते. विशेष म्हणजे क्वालिफायर २ मध्ये जे सामने जिंकले आहेत, त्यावेळी मुंबई इंडियन्स आयपीएल विजेता ठरला आहे.
मुंबई इंडियन्स २०१३ साली क्वालिफायर २ मध्ये विजेता ठरला होता. त्यावेळी राजस्थानसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर फायनलमध्ये त्यांनी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत करून विजेतेपद मिळवलं होतं. तर २०१७ मध्ये देखील याचीच पुनरावृत्ती झाली होती. क्वालिफायर २ मध्ये विजय मिळवल्यानंतर फायनलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सला धूळ चारून चॅम्पियन ठरले होते. मुंबई इंडियन्स २०२३ मध्ये क्वालिफायर २ लढतीत पराभूत झाला होता.
आयपीएलच्या क्वालिफायर २ मध्ये मुंबई आणि पंजाब आमनेसामने असतील. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला हरवणं मुंबईला थोडं कठीण जाणार आहे, असं मानलं जात आहे. दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण ३३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील १७ सामने मुंबईने जिंकले आहेत. तर १६ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यंदाच्या स्पर्धेत लीग स्टेजमधील सामन्यातही पंजाबविरुद्ध जिंकू शकले नव्हते. त्यामुळे मुंबईसमोर पंजाबला नमवण्याचं तगडं आव्हान असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.