
टी-२० मालिकेत ४-१ ने धूळ चारल्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंडचा चांगलाच पाहूणचार केलाय. श्रीलंकेकडून २-० ने पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता.
या धक्क्यातून सावरत भारतीय संघाने वनडे क्रिकेटमध्ये दमदार कमबॅक केलं आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली. यासह भारतीय संघाने इंग्लंडवर ४ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. यासह वनडे मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४९ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाचा फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान फार मोठं नव्हतं. भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानावर आली.
दोघांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र यशस्वी १५ तर रोहित अवघ्या २ धावा करत माघारी परतला. भारताला हवी तशी सुरुवात मिळाली नव्हती. मात्र त्यानंतर फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने भारतीय संघाला वादळी सुरुवात करुन दिली. अय्यरने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३६ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार खेचले.
श्रेयस अय्यरने पाया रचल्यानंतर, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा कळस चढवला. या डावात दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समचार घेतला. दोघांनी शानदार शतकी भागीदारी करत भारताला ४ गडी राखून विजय मिळवून दिला. यादरम्यान गिलने ८७ धावांची खेळी केली. तर अक्षरने ५२ धावांची खेळी केली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर जेकब बेथलने ५१ धावा केल्या आणि फिल सॉल्टने ४३ धावा केल्या. इंग्लंडचा डाव ४७.४ षटकात २४८ धावांवर आटोपला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.