
एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यानंतर भारताला विजेतेपद मिळूनही ट्रॉफी नाकारली गेल्याने अजून एका वादाला तोंड फुटलं आहे. सामन्यानंतरच्या समारंभात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी अचानक ट्रॉफी घेऊन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून निघून गेल्याने भारतीय टीमनेही कडक भूमिका घेतली. भारताने ट्रॉफी नकवी यांच्या हातून घेण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे पोस्ट प्रेझेंटेशनला जवळपास एक तास उशिरा झाला.
एशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अनेकदा उफाळून आला होता. हात मिळवण्यास नकार देणं, चिथावणीखोर इशारे करणं अशा अनेक घटना स्पर्धेत घडल्या. मात्र अंतिम सामन्यानंतरचा ट्रॉफी समारंभ हा सर्वात वादग्रस्त ठरला.
ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार ACC चे अध्यक्ष नकवी यांनी ट्रॉफी प्रदान करायची होती. परंतु, टीम इंडियाने त्यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. याचं कारण म्हणजे नकवी यांनी ACC अध्यक्ष म्हणून आपली भूमिका अनेकदा पक्षपातीपणे निभावली होती आणि पाकिस्तान क्रिकेटलाच प्राधान्य दिलं होतं.
संपूर्ण पोस्ट प्रेझेंटेशन 45 मिनिटांनी उशिरा सुरू झाला. पुन्हा सुरू झाल्यानंतर नकवी मंचावर उभे होते. भारताचे कुलदीप यादव आणि अभिषेक शर्मा यांनी त्यांचे वैयक्तिक पुरस्कार स्विकारले. त्यानंतर समालोचक सायमन डूल यांनी जाहीर केलं, “आशियाई क्रिकेट परिषदेने कळवलं आहे की, टीम इंडिया आज आपली विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारणार नाही. त्यामुळे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन इथे संपतं.”
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्माने पत्रकार परिषद घेतली. सूर्यकुमार म्हणाला, “मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून आजपर्यंत असं कधीच पाहिलं नव्हतं. एखाद्या विजेत्या टीमला ट्रॉफी न देणं… तेही अशी कठीण मेहनतीने मिळवलेली ट्रॉफी. आम्ही 4 तारखेपासून इथे आहोत, दोन दिवसांत दोन उत्तम सामने खेळलो. आम्ही ही ट्रॉफी कमावली आहे. त्यापेक्षा जास्त काही सांगणं गरजेचं नाही. मी सगळं सांगितलं.”
तो पुढे म्हणाला, “माझ्यासाठी खरी ट्रॉफी माझ्या ड्रेसिंग रूममध्ये आहे. ते 14 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ. हाच खरा पुरस्कार आहे. एशिया कपच्या या प्रवासात मी या टीम मेट्सचा खूप मोठा चाहता आहे. हीच खरी आठवण आहे जी आयुष्यभर माझ्यासोबत राहील.”
संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार म्हणाला, “ट्रॉफी आम्हाला मिळाली नाही, याचं काही फारसं महत्त्व नाही. जगाला माहिती आहे की एशिया कप 2025 कोण जिंकलं. आमचं नाव मोठ्या स्क्रीनवर लिहिलं गेलं. Asia Cup 2025 Champions: India. त्यापेक्षा मोठा सन्मान कोणता?”
एशिया कप 2025 च्या फायनलमध्ये सामन्यात भारताने 147 रन्सचं लक्ष्य दोन बॉल शिल्लक ठेवून आणि पाच विकेट्स राखून गाठलं. तिलक वर्माने 53 बॉल्समध्ये नाबाद 69 रन्स करून सामना फिरवला. त्याच्या फलंदाजीमध्ये तीन फोर आणि चार सिक्सेसचा समावेश होता. या विजयासह भारताने एशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.