Team India Victory Parade| हुश्शsss.. मुंबईवरील चेंगराचेंगरीचं संकट टळलं! टीम इंडियाच्या मुंबईतील विजयी यात्रेतील गर्दी मॅनेज करण्यात यंत्रणा फेल

Team India Victory Parade : टीम इंडियाच्या खेळाडूंना बघण्यासाठी मरीन ड्राइव्हवर झालेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून आले. हाथरस घटना ताजी असतानाच, मुंबईवरही चेंगराचेंगरीचं संकट कोसळलं असतं. सुदैवानं मोठा अनर्थ टळला.
Team India Victory Parade Stampede like Situation at Marine Drive at Mumbai
Team India Victory Parade Stampede like Situation at Marine Drive at MumbaiSAAM TV
Published On

टीम इंडियानं टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत विजयी रॅली काढण्यात आली. मरीन ड्राइव्हवर ही विजयी रॅली काढली. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्यासह टीम इंडियाच्या चॅम्पियन खेळाडूंना बघण्यासाठी निळ्याशार समुद्राच्या किनाऱ्याजवळील रस्त्यावर जणू निळा सागर लोटला होता. लाखोंची गर्दी होती. एक झलक डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी गर्दीची लाट उसळली होती. ही गर्दी कंट्रोल करण्यात पोलीस आणि इतर यंत्रणांची दमछाक झाली. नियोजनशून्य कारभारामुळं यंत्रणेच्या नाकीनऊ आले होते. हाथरससारखी दुर्घटना नुकतीच घडली होती. तशीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीनं मुंबईत जमलेल्या गर्दीत एक जरी चूक घडली असती तर, मोठा अनर्थ घडला असता.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली. तब्बल १७ वर्षांनी टी २० वर्ल्डकप जिंकला होता. एका तपाहून अधिक काळ या क्षणाची वाट चाहत्यांना बघावी लागली होती. सहाजिकच या विजयाचा आनंद कैक पटीनं मोठा होता. टीम इंडिया मायदेशी परतल्यानंतर दिल्लीत झालेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या खेळाडूंचं तोंडभरून कौतुक केलं. त्यानंतर संघाचे खेळाडू मुंबईत आले.

Team India Victory Parade Stampede like Situation at Marine Drive at Mumbai
Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजय रॅलीदरम्यान अनेकांचा दम घुसमटला; मरीन ड्राइव्हला चपलांचा खच; पाहा VIDEO

मरीन ड्राइव्हवर ओपन डेक बसमध्ये लाडक्या खेळाडूंची विजयी रॅली काढण्यात आली. या खेळाडूंना बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून चाहते आले होते. त्यामुळं मरीन ड्राइव्हवर मोठी गर्दी उसळली होती. पण त्यांचा अतिउत्साह आणि त्यात झालेली चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती, चपलांचा खच, जमिनीवर पडलेले तरूण-तरूणी ही दृश्ये हृदयाचे ठोके वाढवणारी होती. थोडं जरी अनपेक्षित घडलं असतं तर मुंबईवर मोठं संकट कोसळलं असतं. सुदैवानं हे संकट टळलं. एवढी मोठी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आधीच प्लान करायला हवा होता, हा ढिसाळपणा यंत्रणेच्या अंगलट आला असता, अशा शब्दांत सर्वसामान्य व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भीती व्यक्त करत आहे.

Team India Victory Parade Stampede like Situation at Marine Drive at Mumbai
Team India Victory Parade: वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने ढोल ताशावर धरला ठेका

गर्दीचा अंदाज आणि नियोजनही चुकलं?

विश्वविजेत्या टीम इंडियाच्या विजयी यात्रेला इतक्या मोठ्या संख्येने गर्दी होईल, हे कुणाच्या ध्यानीमनीही नसेल. त्यामुळं सरकारी यंत्रणांचा नियोजनाचा अंदाज सपशेल फसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी चेंगराचेंगरीसदृश्य घटना घडल्या. काही जणांची गर्दीत घुसमट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात न्यावं लागलं. ही गर्दी जसजशी वाढत होती, रेटा वाढत होता, तसे हृदयाचे ठोके वाढत होते. मरीन ड्राइव्हवरील गर्दी बघून धडकी भरली होती. सुदैवानं चेंगराचेंगरीसारखी घटना न घडल्यानं सर्वांचाच जीव भांड्यात पडला. लाखोंच्या संख्येने झालेली गर्दी आणि उडालेली तारांबळ यामुळं नियोजनाबाबत मुंबई पोलिसांनीही नाराजी व्यक्त केल्याचं 'सकाळ'च्या वृत्तात म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com