

१५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने भारतीय क्रिकेट वर्तुळात आपली वेगळीच छाप सोडली आहे. आजी-माजी खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीने प्रभावीत झाले आहेत. आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅपवर कब्जा केला. आता वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी द्या, अशी मागणी अनेकजण करत आहेत. टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि निवडकर्ता देवांग गांधी यांनीही वैभव सूर्यवंशीसाठी बॅटिंग केली.
टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशीने सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्याला लवकरात लवकर संघात स्थान द्यायला हवं, असे मत देवांग गांधी यांनी व्यक्त केले. वैभव सूर्यवंशी याला फक्त टी२० नव्हे तर कसोटीतही स्थान मिळायला हवं. कसोटी क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी गोलंदाजांची डोकेदुखी ठरू शकतो, असे ते म्हणाले.
वैभव सूर्यवंशी याला भारतीय संघात स्थान द्यावं. कारण, मागील २ वर्षांत त्याने शानदार कामगिरी केली आहे. जगातील अव्वल गोलंदाजांची त्याने धुलाई केली, असे गांधी यांनी आयएएनएसला सांगितले. तो आपला खेळ सहज बदलू शकतो, हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरेल, असेही ते म्हणले. गांधी यांनी वैभव याला क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्याला इंडिया 'अ' संघाच्या सामन्यांमधून ५० षटकांच्या आणि लाल चेंडूच्या क्रिकेटचा अनुभव देण्याच्या महत्त्वावर भर दिला.
वैभव सूर्यवंशी याने फक्त फटकेबाजीच केली नाही. तर त्याने परिस्थिती पाहून फलंदाजी केली. एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशी याने प्रतिभा दाखवली. संघाला गरज असेल, त्या परिस्थितीत त्याने फटकेबाजी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला त्याने संयमी फलंदाजी करत धावा वाढवल्या. गरज पडल्यास तो आपल्या खेळण्याच्या शैलीत बदल करू शकतो, ही जमेची बाजू असल्याचे गांधी यांनी सांगितले.