

विधानसभा निवडणूक निकालानंतर तमिळनाडूत वेगाने घडामोडी घडत आहेत. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीके पक्षाचे (TVK Party) प्रमुख थलापती विजय बहुमतापासून काही पावलं दूर आहेत. स्पष्ट बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी विजय यांना कसरत करावी लागत आहे. विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या ११८ आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षरींचं पत्र घेऊन येण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.
टीव्हीके प्रमुख थलापती विजय यांना राज्यपालांकडून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. विजय यांनी यापूर्वीही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नसल्यानं राज्यपालांनी दुसऱ्यांदा त्यांना रिकाम्या हाती माघारी पाठवलं आहे. त्यामुळं तमिळनाडूत सत्तास्थापनेचा पेच वाढला आहे.
विजय यांनी राज्यपालांची दुसऱ्यांदा भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी ११८ आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षरीचं पत्र घेऊन या असा पुनरुच्चार केला. टीव्हीकेकडे स्पष्ट बहुमत असेल तरच आता शपथसोहळा होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार स्थापन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची अस्थिरता नको असं राज्यपालांचं म्हणणं आहे. त्यामुळे शपथविधीआधीच सत्ताधारी पक्षाकडे स्पष्ट बहुमत असणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, एआयएडीएमकेचे नेते पलानीसामी यांनीही राज्यपालांची भेट मागितली आहे. तर डीएमकेच्या गोटातही हालचाली सुरू आहेत. व्हीसीकेचे प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी एमके स्टॅलिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. व्हीसीके लवकरच टीव्हीकेसोबत आघाडी करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर व्हीसीके टीव्हीकेसोबत जाणार असेल तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, असे डीएमकेचे म्हणणे असल्याचे कळते.
तमिळनाडूत सत्तास्थापनेचा पेच वाढला आहे. थलापती विजय यांची बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी कसरत सुरू आहे. सत्तास्थापनेसाठी आवश्यक ११८ आमदारांच्या पाठिंब्याचे सह्यांचे पत्र राज्यपालांकडे देणे हा थलापती विजय यांच्यासमोरचा मुख्य पर्याय आहे. विजय यांनी पत्र दिल्यानंतर राज्यपाल टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देऊ शकतात.
सरकार स्थापन केल्यानंतर टीव्हीकेला विधानसभेत विश्वासमत सिद्ध करावा लागणार आहे. संविधानातील अनुच्छेद १७४ आणि १७५ (२) नुसार, राज्यपालांकडे विशेष अधिवेशन बोलावण्याचा आणि विश्वासमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याचे अधिकार आहेत. सध्या टीव्हीकेकडे काँग्रेसचे आमदार मिळून ११२ आमदारांचा पाठिंबा आहे.
विजय यांच्यासमोर दुसरा पर्याय म्हणजे पाठिंबा असलेल्या आमदारांना राज्यपालांसमोर हजर करावे लागणार आहे. टीव्हीकेकडे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आमदारांचे समर्थन असल्याचे सिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. पण आवश्यक संख्याबळाबाबत राजकीय अनिश्चितता असेल किंवा पाठिंब्याच्या पत्राबाबत प्रामाणिकतेवर शंका असेल तरच अशा प्रकारचा मार्ग अवलंबला जाऊ शकतो.
टीव्हीके प्रमुख विजय यांच्याकडून आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव सुरू आहे. काँग्रेस, व्हीसीके आणि अन्य पक्षांकडून पाठिंबा मिळवण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. व्हीसीकेकडे दोन आमदार आहेत. विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, डावे पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगचा डीएमकेला पाठिंबा असेल असे संकेत आधीत त्या पक्षांकडून देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.