
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात मंगळवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. यमुना नदीत पोहताना सहा मुलींचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन सख्ख्या बहिणी, एक चुलत बहीण आणि एक नातेवाईक होती. या सर्व जणी यमुना नदीत पोहण्यासाठी उतरल्या होत्या. त्यातील चार मुली बुडाल्या. त्या घटनास्थळीच मृत पावल्या होत्या. तर दोघींना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांना मृत घोषित केलं. ज्या घरात लग्नाची वरात येणार होती, त्याच कुटुंबातील सहा मुलींचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यमुना नदीत बुडाल्यानंतर बेशुद्धावस्थेत ज्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिचं पुढच्या आठवड्यात लग्न होणार होतं, अशी माहिती आहे. घरात लग्नाची तयारी सुरू होती. सगळीकडं आनंदाचं वातावरण होतं. या दुर्घटनेनं अख्ख्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या दुर्घटनेनंतर आग्र्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्यात यावी, असे निर्देश योगींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सिकंदरा परिसरातील नगला नाथू गावात मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी १० वाजताच्या सुमारास या सहा मुली यमुना नदीपात्रात आंघोळीसाठी उतरल्या होत्या. त्याआधी त्यांनी काठावर रील्स बनवले. त्यानंतर पोहण्यासाठी नदीत उतरल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या सर्व जणी बुडू लागल्या. त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथे पोहोचले. काही जणांनी या घटनेची माहिती पोलिसांनाही दिली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यमुना नदीकाठी पोहोचले. त्यांनी स्थानिकांची मदत घेतली. शोध आणि बचावकार्य सुरू केले. पण तोपर्यंत सर्व मुली बुडाल्या होत्या. बऱ्याच वेळानंतर चार मुलींना पाण्याबाहेर काढले. त्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
अन्य दोन मुलींनाही पाण्याबाहेर काढले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारच्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी पंचानामे करून सहा मुलींचे मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवले.
तत्पूर्वी, घटनेच्या काही मिनिटांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सर्व मुली नदीकाठी मौजमस्ती करताना दिसत आहेत. नदीच्या काठावर त्यांनी रील्स बनवले. त्यानंतर त्या पोहण्यासाठी पाण्यात उतरल्या. त्या सहा जणींचा बुडून मृत्यू झाला. दिव्या (वय १४), संध्या (वय १२), शिवानी (१७), नैना (१४), मुस्कान (१८), सोनम (१२) अशी मृत मुलींची नावे आहेत. यातील मुस्कानचं लग्न पुढच्या आठवड्यात होणार होतं. त्याआधीच तिच्यावर काळानं घाला घातला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.