रेल्वे बोर्डाने लोको चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किलोमीटर भत्त्यात १ जानेवारी २०२४ पासून २५ टक्के वाढ जाहीर केली आहे. यामुळे २ लाखांहून अधिक ट्रेन संचालन कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. या वाढीमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या किलोमीटर भत्त्यातील ही वाढ लागू होईल, त्यांना १ जानेवारी २०२४ पासून त्यांची संपूर्ण थकबाकी देखील मिळणार आहे.
विविध रेल्वे कर्मचारी संघटना आणि महासंघ गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून किलोमीटर भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीसाठी सातत्याने निवेदने सादर करत होते आणि आंदोलन ही करत होते. शुक्रवारी जारी केलेल्या एका अधिकृत आदेशात म्हटले आहे की, १ जानेवारी २०२४ पासून महागाई भत्त्यात (डीए) ५० टक्के वाढ लागू झाल्यानंतर, मंडळाने लोको रनिंग स्टाफच्या विविध श्रेणींसाठी किलोमीटर भत्ता त्याच तारखेपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आदेशात म्हटले आहे की, एआयआरएफ (AIRF) आणि एनएफआयआर (NFIR) यांसारख्या मान्यताप्राप्त संघटनांच्या सततच्या मागणीनंतर, रेल्वे बोर्डाच्या वित्त विभागाशी सल्लामसलत करून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली आणि ते मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे (खर्च विभाग) पाठवण्यात आले. या दरवाढीच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या, रेल्वे संचालनात गुंतलेल्या दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे. इतर रेल्वे कर्मचाऱ्यांप्रमाणे, ज्यांना पगारासोबत प्रवास भत्ता (TA) मिळतो, त्याउलट लोको रनिंग स्टाफला पगारासोबत भत्ता (KA) दिला जातो.
एका लोको पायलटने सांगितले की, १ जानेवारी २०२४ पासून इतर कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता (TA) वाढवण्यात आला असला तरी, किलोमीटर भत्त्यामध्ये (KA) कोणताही बदल झालेला नाही. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनच्या (AILRSA) मते, किलोमीटर भत्त्याचे दर दोन घटकांवरून ठरवले जातात मूळ वेतनाच्या ३० टक्के आणि २० दिवसांचा प्रवास भत्ता, असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पूर्वीचा प्रति १०० किमी ५२५ रुपयांचा दर हा प्रति दिन ८०० रुपये प्रवास भत्त्याच्या दरावर आधारित होता. त्यांनी सांगितले की, महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे प्रवास भत्ता १००० रुपयांपर्यंत वाढला आहे, त्यामुळे किलोमीटर भत्त्यामध्येही प्रमाणानुसार सुधारणा करणे आवश्यक झाले आहे.
ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार आहे. एका लोको पायलटने या विलंबाबद्दल तक्रार केली. तो म्हणाला, प्रवास भत्ता ८०० रुपयांवरून १००० रुपये केल्यानंतर, किलोमीटर भत्त्याचा दरही वाढवणे आवश्यक होते. रनिंग स्टाफने सांगितले की, महागाई भत्त्याच्या मर्यादेवर आधारित अशाच प्रकारची २५ टक्के वाढ २०११ आणि २०१४ मध्ये लागू करण्यात आली होती. परंतु यावेळी या सुधारणेला लक्षणीय विलंब झाला आहे.