PM Narendra Modi Rajya Sabha Speech
PM Narendra Modi Rajya Sabha SpeechSaam TV

Narendra Modi Speech: मी एकटाच अनेकांना पुरून उरतोय; विरोधकांच्या 'त्या' घोषणेवर PM मोदी भडकले, पाहा VIDEO

आज देश पाहत आहे, मी एकटाच अनेकांवर भारी पडतो आहे. मी देशासाठी जगतोय, देशासाठी काहीतरी करण्यासाठी बाहेर पडलोय, असं म्हणत मोदींनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले.
Published on

PM Narendra Modi Rajya Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करण्यासाठी भाषण सुरू केलं. मोदी भाषणासाठी उभे राहताच विरोधकांनी राज्यसभेत प्रचंड गदारोळ घातला. मोदींना पाहताच, विरोधी बाकावर बसलेल्या खासदारांनी मोदी-अदानी भाई भाई, अशा घोषणा दिल्या. या घोषणा देणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी चांगलंच सुनावलं आहे. (Latest Marathi News)

आज देश पाहत आहे, मी एकटाच अनेकांवर भारी पडतो आहे. मी देशासाठी जगतोय, देशासाठी काहीतरी करण्यासाठी बाहेर पडलोय, असं म्हणत मोदींनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. एवढ्या महत्त्वाच्या सभागृहात बसणाऱ्या लोकांची भाषा देशाला निराश करणारी आणि दुर्दैवी अशी आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर शायरी करत चांगलाच निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

राज्यसभेत भाषण करताना मोदींनी शायरी केली. ते म्हणाले, 'किचड उसके पास था, मेरे पास गुलाल जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल' त्यामुळे तुम्ही जितका चिखल आमच्यावर फेकाल तेवढीच कमळं फुलत राहतील. तुम्ही कमळ फुलवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो.

'काँग्रेसने देशाचं वाटोळं केलं'

काँग्रेसनं ६ दशकं देशाचं वाटोळं केलं. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही. ६० वर्षात त्यांनी फक्त देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केली. मागील 9 वर्षात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणींपासून आम्ही पळणारे नाहीत, त्यावर उपाय शोधणारे आहोत. देशाच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच कायमची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, असं मोदींनी ठणकावून सांगितलं.

'देशाने काँग्रेसला वारंवार नाकारलंय. पण आजही काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष कट कारस्थान करायचं सोडत नाहीयेत. पण जनता मात्र त्यांच्याकडे डोळसपणे बघते आहे आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी नाकारते आहे', असा चिमटा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांना काढला.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत आम्ही आदिवासी लोकांसाठी ५०० एकलव्य मॉडेलच्या शाळा मंजूर केल्या आहेत. ही संख्या चारपट जास्त आहे. तसेच या शाळांमध्ये ३८ हजार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही मागील नऊ वर्षात देशातील अडचणीवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही करत राहू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com