अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर वक्तव्य करून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. राष्ट्रपती मुर्मू या भाषणावेळी थकल्या होत्या, असं गांधी म्हणाल्या. यानंतर भाजपनं चहुबाजूने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफीची मागणी केली.
सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर शंका उपस्थित केली होती. राष्ट्रपती अभिभाषणावेळी थकल्या होत्या असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावर आता भाजपनं टीकास्त्र डागलं आहे. सोनिया गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. तर राष्ट्रपती भवनकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. सोनिया गांधी यांच्या वक्तव्याने सर्व मर्यादा संपुष्टात आल्या आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य खरेतर टाळता आले असते. राष्ट्रपती भवनच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काय म्हणाल्या होत्या सोनिया गांधी?
सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांना 'पुअर लेडी' असं संबोधलं. भाषणावेळी त्या खूपच थकलेल्या दिसल्या. बोलताना त्या अडखळत होत्या, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीच्या द्वारकामध्ये निवडणूक प्रचारसभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केलाच, शिवाय सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली. मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणाचं कौतुक केलं, तर दुसरीकडे सोनिया गांधी यांचे वक्तव्य हे अपमान करणारे आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले. त्या ओडिशाच्या जंगलातील आदिवासी कुटुंबातून इथपर्यंत पोहोचल्या आहेत. हिंदी ही त्यांची मातृभाषा नाही. त्या उडिया बोलतात. मातृभाषा नसूनही त्यांनी हिंदीत खूप चांगल्या पद्धतीने भाषण केले आणि सगळ्यांना प्रेरित केले. मात्र, गांधी या राष्ट्रपतींना गरीब आणि थकलेल्या म्हणाल्या, याकडेही मोदींनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. यांना आदिवासी मुलीचं बोलणं कंटाळवाणं वाटतं. हा देशातील १० कोटी आदिवासी बंधू-भगिनींचा हा अवमान आहे. काँग्रेसच्या या शाही कुटुंबाला तळागाळातून आलेले लोक आवडत नाहीत. गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे लोक पुढे जात आहेत, पण त्यांना पावलोपावली अपमानित केले जाते, असे मोदी म्हणाले.
या लोकांना शिवीगाळ करणे, भारताची बदनामी करणे, अर्बन नक्षलवादाच्या गोष्टी करणं यांना अधिक चांगलं वाटतं. या लोकांपासून खूप सावध राहायला हवं, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.