
PM Modi Lok Sabha Speech In Loksabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मोदींनी माजी पंतप्रधानांच्या एका जुन्या वक्तव्याचं उदाहरण देताना सभागृहात किस्सा सांगितला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावरही टीकास्त्र सोडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, लोकसभेच्या कामकाजात सहभागी झाले. सभागृहात मोदी येताच भाजप आणि एनडीएच्या सदस्यांनी 'मोदी-मोदी' अशी घोषणाबाजी करत पंतप्रधानांचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेत सहभागी होण्याचं भाग्य मिळालं असं सांगतानाच, देशातील जनतेचे मोदींनी आभार मानले. ते म्हणाले की 'आपण २०२५ मध्ये आहोत आणि २१ व्या शतकातील एक चर्तुथांश काळ निघून गेला आहे. आपण राष्ट्रपतींचं संबोधन अगदी बारकाईनं अभ्यासला तर स्पष्ट दिसेल की ते नव्या भारतासाठी आत्मविश्वास निर्माण करेल. जनसामन्यांना प्रेरित करणारं राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे.'
आमच्या सरकारनं फक्त घोषणा दिल्या नाहीत. गरिबांची खऱ्या अर्थानं सेवा केली. पाच पाच दशकं खोट्या घोषणा दिल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्ने अशीच समजत नाहीत. त्यासाठी भावना समजाव्या लागतात. पण काही लोकांकडे नेमकं तेच नाही हे दुर्दैवानं सांगावं लागतं, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदींनी सभागृहात एक जुना किस्सा सांगितला. 'आपल्या देशात एक पंतप्रधान होते. त्यांना मिस्टर क्लीन बोलण्याची फॅशन झाली होती. ते पंतप्रधान म्हणाले होते की, दिल्लीतून एक रुपया निघायचा, गावापर्यंत त्यातील १५ पैसे पोहोचायचे.' आता त्यावेळी तर पंचायतपासून संसदेपर्यंत एकाच पक्षाचं राज्य होतं आणि ते पंतप्रधान जाहीरपणे म्हणाले होते की दिल्लीतून एक रुपया बाहेर निघतो, गावात पंधरा पैसे पोहोचतात. खूपच गजब हातसफाई होती. पंधरा पैसे कुणाकडे जायचे हे देशातील सर्वसामान्य माणूसही सहज सांगू शकत होता, असं मोदींनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
देशानं आम्हाला संधी दिली. आम्ही अनेक समस्यांवर मार्ग शोधला. बचत आणि विकास हा आमचा मॉडेल. जनतेचा पैसा जनतेसाठी, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी राहुल गांधींना टोला लगावला. काही नेत्यांचं लक्ष आपल्या घरातील स्टायलीश बाथरूमवर असतं. पण आमचं लक्ष तर प्रत्येक घरातील नळाला पाणी देण्यावर आहे. १२ कोटी नागरिकांसाठी नळाद्वारे पाणी पोहोचवलं. गरिबांची घरं तयार करण्याकडे आमचं लक्ष आहे. जे लोक गरिबांच्या झोपडीत जाऊन फोटोसेशन करतात, त्यांना गरिबांबद्दलच्या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात, अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधींवर तोफ डागली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.