नवी दिल्ली/मुंबई: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर राजकारण तापलं असतानाच, आता संसद भवन परिसरात धरणे आणि आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे. संसद भवन परिसरात धरणे धरण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे राज्यसभेतर्फे प्रसिद्ध केलेल्या नव्या आदेशात म्हटलं आहे. (Parliament Monsoon Session)
यावरून काँग्रेसने टीकेचा सूर लावला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राज्यसभेच्या आदेशाच्या प्रतीचे स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच ''विशगुरू का लेटेस्ट साल्वो- D(h)arna मना है!'' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यसभेच्या महासचिवांच्या नव्या आदेशानुसार, संसद (Parliament) सदस्य धरणे, उपोषणासाठी (Protest) संसद परिसरात बसू शकत नाही. सदस्य कोणत्याही प्रकारचे आंदोलन, धरणे आणि उपोषण किंवा कोणत्याही धार्मिक सोहळ्यासाठी संसद भवन परिसराचा वापर करू शकत नाहीत. तसेच याबाबत सहकार्याची अपेक्षा आहे, असे आदेशात म्हटले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी या आदेशाची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संविधानाचा अभ्यास केला असेल तर, कलम १९ नुसार, आंदोलन शांततेत कुठेही करू शकतो. असा आदेशच जर काढला असेल तर, हा लोकशाहीचा अपमान आहे, मी त्याचा निषेध करते. हा अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावरून टीकास्त्र सोडलं आहे. यापुढे संसदेत काहीच करता येणार नाही. बोलता येणार नाही. हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या राहून जावं लागेल. या देशात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.