

उत्तर प्रदेशात उभारण्यात आलेला गंगा एक्सप्रेसवे (Ganga Expressway) अखेर आज खुला करण्यात आला आहे. यामुळे यामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आज म्हणजेच २९ एप्रिल २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भव्य प्रकल्पाचं उद्धाटन केलं आहे.
सुमारे 594 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेसवे केवळ उत्तर प्रदेशचाच नाही तर देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेपैकी एक मानला जातोय. पश्चिम ते पूर्व उत्तर प्रदेश असा मोठा भूभाग जोडणारा हा एक्सप्रेसवे आहे. या मार्गात तब्बल तब्बल 519 गावं आणि 12 जिल्ह्यांना एकत्र जोडलंय.
या एक्सप्रेसवेची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजौली गाव (NH-334) याठिकाणाहून होते. तर शेवट प्रयागराजमधील जुडापूर डांडू गाव (NH-19) याठिकाणी होतो. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 36,230 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
हा एक्सप्रेसवे मेरठ, हापुड, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहांपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज या 12 जिल्ह्यांमधून जातो. सध्या हा 6-लेनचा मार्ग आहे. येत्या भविष्यात तो 8-लेन करण्याचा आराखडा तयार आहे.
या प्रकल्पाची आणखी एक खासियत म्हणजे शाहजहांपूर जिल्ह्यात 3.5 किलोमीटर लांबीची हवाई पट्टी तयार करण्यात आलीये. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय वायुसेनेची लढाऊ विमानं याठिकाणी सहज उतरू शकतात आणि उड्डाणही करू शकतात.
गंगा आणि रामगंगा नद्यांवर दोन मोठे पूल उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच 14 मोठे पूल, 126 लहान पूल, 8 रोड ओव्हरब्रिज आणि 18 फ्लायओव्हर बांधण्यात आले आहेत. वाहनांची ये-जा सोपी व्हावी म्हणून 18 इंटरचेंजची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मार्गावर वाहनं ताशी 120 किलोमीटर वेगाने धावू शकतील, अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल साइनबोर्ड आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अॅम्ब्युलन्सची सुविधाही उपलब्ध आहे.
या एक्सप्रेसवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाचा वेळ निम्म्यावर आला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातून पूर्व भागात पोहोचण्यासाठी आधी 12 तास लागत होते ते आता केवळ 6 तासांत शक्य होणार आहे.
याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गावर रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, ट्रॉमा सेंटर आणि पार्किंग झोनचीही सोय करण्यात आली आहे. या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आता आपली शेतीमाल पूर्व भागात जलदगतीने पोहोचवू शकणार आहेत.