

महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार
८ राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ
सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर इतर भागांमध्ये उष्णतेची लाट आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह १३ राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, १६ ते १९ एप्रिल दरम्यान पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये १६ ते १९ एप्रिल, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये १७ ते १९ एप्रिल, मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिल, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल आणि रायलसीमामध्ये १७ व १८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यासह गंगा खोऱ्यातील काही भागांमध्ये म्हणजेच पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये १६ ते २१ एप्रिल दरम्यान, किनारपट्टीवरील महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम येथे १६-१७ एप्रिल रोजी, गुजरात राज्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये १६ ते १८ एप्रिल दरम्यान, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक आणि केरळ, माहे येथे १६ ते १९ एप्रिल दरम्यान तीव्र उष्णता जाणवू शकते, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, वायव्य भारतावर पश्चिमी वाऱ्यांसह एक पश्चिमी प्रणाली सक्रिय आहे. १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळे वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.
ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालयमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशीच हवामान परिस्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये राहील. अरुणाचल प्रदेशात १६ ते १९ एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. पश्चिम भारतातील मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.