

झारखंडमधील सारंडा जंगलात नक्षलवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. ३६ तासांपासून चकमक सुरू असून, आतापर्यंत २१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी १५ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती होती. शुक्रवारी आणखी सहा मृतदेह आढळले. २ कोटींहून अधिक रुपयांचं बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी अनलसह २५ जणांना घेरण्यात आलं होतं. आतापर्यंत अनलसह २१ नक्षली मारले गेले.
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या सारंडा येथील घनदाट जंगलात जवळपास दोन डझन नक्षलवाद्यांसह पतिराम मांझी उर्फ अनल दा याला जवानांनी घेरलं. सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. नक्षलवाद्यांकडून सुरुवातीला गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. त्यात दोन कोटींहून अधिक बक्षीस असलेला अनल दा हा मारला गेला. त्याच्यावर झारखंड सरकारनं एक कोटी रुपये आणि ओडिशा सरकारनं १.२ कोटी रुपये, तसेच एनआयएने १५ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
अनल दा हा नक्षलवाद्यांच्या मिलिट्री कमिशनचा प्रमुख होता. अलीकडच्या काही वर्षांत कोल्हानच्या सरंडा जंगल परिसरात नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या पथकांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये अनलची भूमिका महत्वाची होती. या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांमध्ये २५ लाख रुपये बक्षीस असलेला सैक कमांडर अनमोल उर्फ सुशांत याचाही समावेश आहे. अनमोल याच्यावर ओडिशात देखील ६५ लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक डझनहून अधिक जणांची ओळख पटलेली आहे. यात काही महिलांचाही समावेश आहे.
चाईबासाच्या किरीबुरू येथील बिहड कुमडी आणि होंजोदिरी गावाच्या दरम्यान गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास जोरदार चकमक झाली. त्यानंतर जवानांनी शोधमोहीम तीव्र केली. पोलिसांनी सर्च ऑपरेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्र हस्तगत केली. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला आहे. या मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आलं असून, नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.