

देशभरात 'ब्रिज मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित इंजिनिअर गिरीश भारद्वाज यांचं मंगळवारी पहाटे कर्नाटकातील सुलिया इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हृदयाशी संबंधित आजारावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सुलियातील केव्हीजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या गिरीश भारद्वाज यांनी कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील दुर्गम भागांमध्ये 150 हून अधिक कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक हँगिंग फुटब्रिज बांधले. रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे अनेक गावं वर्षानुवर्षे वेगळी पडली होती. त्यांच्या पुलांमुळे या गावांतील नागरिकांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध झाला.
मांड्या इथल्या पीईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. विशेष म्हणजे त्यांना सिव्हिल इंजिनिअरिंगचे औपचारिक शिक्षण नव्हतं. तरीही त्यांनी स्वतः अभ्यास करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूल बांधण्याचं तंत्र आत्मसात केलं होतं.
1989 मध्ये सुलिया तालुक्यातील अरंबुरू गावातील नागरिकांनी नदी ओलांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या होडीऐवजी सुरक्षित पर्याय उभारून देण्याची विनंती त्यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी पुस्तकं वाचून आणि तज्ज्ञांशी चर्चा करून सस्पेन्शन ब्रिजची रचना समजून घेतली. त्यावेळी अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी पहिला हँगिंग पूल उभारला.
पारंपरिक पुलाच्या तुलनेत हा पूल सुमारे दहापट कमी खर्चात तयार झाला. या पुलासाठी दोन लाख रुपयांपेक्षाही कमी खर्च आला. गावकऱ्यांनी स्वतः श्रमदान करून या कामात सहभाग घेतला. पुढे त्यांनी उभारलेल्या अनेक पुलांसाठी हाच फॉर्म्युला वापरला गेला. लोकवर्गणीतून निधी उभारणं, कमी खर्चात साहित्य वापरणं आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून काम पूर्ण करणं हीच त्यांच्या कामाची खासियत ठरली.
गिरीश भारद्वाज अनेकदा सांगायचे की, या पुलांमुळे आजारी व्यक्तींना वेळेत रुग्णालयात पोहोचवणं शक्य झालं. अनेक गावांसाठी हे पूल म्हणजे केवळ नदी पार करण्याचा मार्ग नव्हता तर जीवन वाचवणारी सुविधा होती.
ग्रामीण भागासाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण कामाची दखल घेत भारत सरकारने जानेवारी 2017 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं. त्यावेळी त्यांनी चार राज्यांमध्ये 125 हून अधिक पूल उभारले होते आणि अनेक ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू होते. मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक गावांमध्ये निधीची कमतरता असल्याने काही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातूनही पैसे खर्च केले.
पूरग्रस्त नद्या, दाट जंगल आणि अत्यंत दुर्गम भागात त्यांनी पूल उभारले. ओडिशामध्ये नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागातही त्यांनी काम केलं. सुरुवातीला काही सरकारी यंत्रणांनी दोरीच्या साहाय्याने बांधलेल्या पुलांना तात्पुरते लष्करी पूल समजून त्याबाबत शंका व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा पाहून त्यांना सर्वांची मान्यता मिळाली.
गिरीश भारद्वाज यांच्या पश्चात दोन मुलं सुदर्शन आणि पतंजली, तसंच मुलगी राश्या असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी उषा यांचं यापूर्वीच निधन झालं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.