BJP MLA son toll plaza assault video : टोल नाक्यावर भाजप आमदाराच्या मुलाने राडा घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फास्टॅग नसल्याने टोल कर्मचाऱ्याने कार आडवल्यामुळे आमदारपुत्राचा पारा चढला. गाडी का रोखली? पैसे का मागितले? या रागातून आमदारपुत्राने टोल कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली. कारमध्ये असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने मध्यस्थी करत हा वाद मिटवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कर्मचारी आपले काम करत होता, त्याला मारहाण करण्याची गरज नव्हती, असा सूर सोशल मीडियावर दिसत आहे. ही घटना आग्रामधील रायभा टोल प्लाझावर झाली. भाजप आमदार चौधरी बाबूलाल यांच्या मुलाने टोलवरील कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली.
मंगळवारी आग्रा दक्षिण बायपासवरील रायभा टोल नाक्यावर शाब्दिक चकमकीचे रूपांतर जोरदार वादात झाले. फतेहपूर सिक्रीचे आमदार चौधरी बाबूलाल यांच्या मुलाला टोल भरायला सांगितल्याने वाद उफळला गेला. दुपारी १२ वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान, आमदार चौधरी बाबूलाल यांनी टोल कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सुरेश चौधरी कोल्ड स्टोरेज सुविधेतून किरावलीला परतत असताना टोल कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले. गाडी आमदाराची असल्याचे ओळखल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले त्यामुळे वाद झाला.
स्थानिक मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, भाजप आमदार चौधरी बाबूलाल यांचा मुलगा सुरेश चौधरी हा काळ्या रंगाच्या कारमधून मधुरेकडे निघाला होता. कारवर आमदार असे लिहिलेले होते. पण फास्टॅग नसल्याचे कारण देत टोल कर्मचाऱ्यांनी पडताळणीसाठी बूम बॅरियर खाली केला. पण त्यानंतर वाद सुरू झाला. कारमध्ये बसलेल्या सुरेश यांना राग अनावर झाला. चौधरी यांनी गाडीतून उतरून एका टोल कर्मचाऱ्याला चापट मारली. वाद आणखी वाढणार होता पण आमदारपुत्रासोबत असलेल्या व्यक्तीने मध्यस्थी करत परिस्थिती हाताळली. टोल नाक्यावरील इतर कर्मचारी अन् मॅनेजर यांनी आमदारपुत्राच्या कारला नंतर जाऊ दिले. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून ४२ सेकंद आणि ५६ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, टोल नाक्यावर झालेल्या राड्या प्रकरणात टोल कर्मचाऱ्याकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी रात्री उशिरा टोल कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने तडजोड केल्याच सांगितले, याबाबत त्याने पत्रही दिले. त्या पत्रात म्हटले आहे की पडताळणी दरम्यान वाद उद्भवला होता. पण हे प्रकरण मिटवण्यात आले आहे. आम्हाला कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही.