बिहारच्या गंगा घाटावर बोट उलटून मोठी दुर्घटना
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत
सात जणांना स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले
गंगा नदीत शोधमोहीम सुरू आहे
BIHAR BOAT ACCIDENT AT UMANATH GANGA GHAT 2 DEAD 5 MISSING AFTER BOAT CAPSIZES बिहारच्या बरह जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आज पहाटे बरहमधील प्रसिद्ध उमानाथ गंगा घाटावर प्रवाशांनी भरलेली एक बोट गंगा नदीत उलटून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. सात जणांना स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास १४ जणांना घेऊन ही बोट दियारा भागाकडे निघाली होती. नदीच्या मध्यभागी पोहोचताच अचानक बोटीचा तोल गेला आणि काही क्षणांतच बोट पाण्यात उलटली. बोट उलटताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. घाटाजवळील स्थानिक नागरिकांनी तत्काळ नदीत उड्या मारत काही प्रवाशांना बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी गरिमा लोहिया आणि एसडीपीओ रामकृष्ण यांनी आपल्या पथकासह उमानाथ गंगा घाटावर तळ ठोकला आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकाकडून गंगा नदीत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. बेपत्ता असलेल्या पाच जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून नदीच्या विविध भागात तपास सुरू आहे.
दरम्यान, या अपघातानंतर घाट परिसरात मोठी गर्दी जमली. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोटींमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात आहेत का, सुरक्षेची साधने उपलब्ध होती का, याबाबत प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.