
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, बदलापूर आणि मुरबाड परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये अवघ्या चार तासांत १६० मिमी पावसाची नोंद झाली असून, परिणामी काही भागांत पाणी साचले होते. या परिस्थितीत १०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व महानगरपालिका क्षेत्रांत पावसाची नोंद झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात काही काळ पाणी साचले होते. मात्र, आता पूर्णपणे पाण्याचा निचरा झालेला आहे. लोकल सेवा सुरळीत आहे. लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, परंतु कुठेही सेवा पूर्णपणे ठप्प झालेली नाही.
जिल्ह्यातील धोकादायक इमारतींबाबत ७०० इमारतींची यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. नालेसफाईचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उल्हास नदी सध्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहे. यावर प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील कसारा, मुरबाड, मुंब्रा, कळवा या भागांमध्ये दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
बदलापूरमध्ये पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असून, १२,००० नागरिकांच्या स्थलांतराची तयारी करण्यात आली आहे. आज सकाळपासून झालेल्या पावसात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. भुयारी मार्गात अडकलेली कार तातडीने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.