राज्यात एकीकडे मराठा आरक्षण आणि जालना येथील लाठीमाराच्या घटनेवरुन वातावरण तापलं असताना, दुसरीकडे राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ ठरली आहे.
येत्या १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमका काय निर्णय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नेमकी कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणून बुजून या प्रकरणावर सुनावणी घेण्यास विलंब करत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून केला जात होता.
दुसरीकडे कायदेशीर बाबी आणि आमदारांकडून लेखी उत्तर मागितल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल, असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं. यासाठी राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांना कायदेशीर नोटीस बजावून लेखी उत्तर मागितलं होतं.
शिंदे गटाकडून (Eknath Shinde) तब्बल ६ हजार पानांचं उत्तर सादर करण्यात आलं. विधिमंडळात या कागपत्रांची पडताळणी केल्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीला १४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
विशेष बाब म्हणजे, शिवसेना शिंदे गटातील ४० आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील १४ आमदारांची एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. दोन्ही गटाकडून दाखल केलेल्या तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहे. या सुनावणीच्या वेळी वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे. दरम्यान, आमदार अपात्रप्रकरणाच्या सुनावणीची तारीख ठरल्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.