मुंबई : मुंबईच्या वातावरणात रविवारी सकाळपासूनच गारवा जाणवत होता. थंड हवा असली, तरी मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले. रविवारी मुंबईत संपूर्ण शहराच्या हवेचा स्तर दिवसभर अतिशय वाईट राहिला. संपूर्ण मुंबई शहराचा एक्यूआय ३३३ नोंदवण्यात आला. जो वाईट समजला जातो. (Mumbai weather worsning)
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रात पोहोचले; मात्र या वादळाच्या वाटेत उत्तर कोकण, मुंबई (Mumbai), ठाणे आणि पालघर आल्याने येथील हवेत धूलिकण पसरले होते. यामुळे मुंबई शहरातील हवेचा (Weather) दर्जा खालावला होता. माझगाव, मालाडसारख्या भागाने प्रदूषणातील वाईट दर्जाचा कळस गाठल्याचे दिसून आले. धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृष्यमानता कमी झाली. हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने मुंबईत प्रदूषण पसरले होते. मुंबईत सकाळपासून हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती सफरने नोंदवली आहे.
दरम्यान, रविवारी मुंबई शहराचा सरासरी एक्यूआय ३३३ इतका नोंदवण्यात आला. काही स्थानिक ठिकाणच्या नोंदींप्रमाणे कुलाबा २२१, भांडुप ३३६, बीकेसी ३०७, चेंबूर ३४७, अंधेरी ३४०, बोरिवली १६२, माझगाव ३७२, वरळी ३१८, मालाड ४३६, नवी मुंबई १०१ असे एक्यूआय नोंदवण्यात आले. यात मालाड आणि माझगाव येथील हवेचा दर्जा प्रचंड प्रमाणात खालावला असल्याचे दिसून आले. या प्रदूषणामुळे श्वसनविकाराचा त्रास रुग्णांना अधिक जाणवला. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यानही हवेचा दर्जा खालावलेला होता.
दरम्यान, दिल्लीची हवा मुंबईच्या हवेपेक्षा चांगली नोंदवण्यात आली आहे. दिल्ली शहराचा एक्यूआय मध्यम १४५ नोंदवण्यात आला आहे; तर पुण्याचाही एक्यूआय समाधानकारक ०६२ नोंद करण्यात आला; तर अहमदाबादचा एक्यूआय २६८ नोंदवण्यात आला असून हवा वाईट दर्जाची नोंदली गेली आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.