मुंबईत १२ जून रोजी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती मंदावल्याने मुंबई आणि पुण्यात उकाडा वाढला
मुंबईत अद्याप मान्सूनचे आगमन नाही
१४ ते १५ जूननंतर मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता
देशात मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दाखल झाला. त्यानंतर तो हळूहळू सरकत गोवा आणि तिथून पुढे महाराष्ट्रात दाखल झाला. मागील वर्षाच्या तुलनेत नैऋत्य मौसमी वारे महाराष्ट्रात उशिराने दाखल झाले. मात्र अद्यापही मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे महाभयंकर 'अल निनो' वादळ. या वादळाने वाऱ्यांची दिशा सतत बदलत असून तापमानात सतत वाढ होत आहे. दरम्यान मुंबई पुण्यात देखील उकाडा वाढला असून जूनचा दुसरा आठवडा उलटला तरी मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून मुंबईसह पुण्यात १५ जूननंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत गुरुवारी (१२ जून) उष्णतेने उच्चांक गाठला. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, कुलाबा वेधशाळेत ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांतील जून महिन्यातील हे सर्वाधिक कमाल तापमान ठरले आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत असून, नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, देशभरात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असून महाराष्ट्रात मात्र त्याचा वेग काहीसा मंदावला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा बहुतांश भाग तसेच पश्चिम बंगालच्या काही भागावर प्रगती केली आहे. गुरुवारी मान्सूनने बिहारच्या काही भागातही प्रवेश केला. त्यामुळे देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात मान्सून सक्रिय होत असताना महाराष्ट्रातील काही भाग, विशेषतः मुंबई आणि आसपासच्या परिसराला अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून मानली जाते. गेल्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर, म्हणजेच २६ मे रोजीच मुंबईत प्रवेश केला होता. त्यामुळे यंदाही पाऊस वेळेआधी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असून ११ जून उलटून गेल्यानंतरही मान्सूनची नोंद झालेली नाही. सध्या अरबी समुद्रातील वातावरण मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फारसे अनुकूल नसल्याने त्याचा वेग मंदावला आहे. मात्र पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, १४ ते १५ जूननंतर मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होऊ शकते. तोपर्यंत मुंबईकरांना वाढत्या उष्णतेचा आणि दमट हवामानाचा सामना करत मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.